जिल्हाधिकार्यांनी काढले सुधारीत आदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात असलेल्या कंटेनमेंट झोन वगळून महापालिका, नगरपालिका हद्दीतील एकल, वसाहती लगत असणारी, निवासी संकुलातील सर्व दुकाने सुरू राहतील. तसेच नागरी क्षेत्रातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुल बंद ठेवण्यात येणार असली तरी या ठिकाणच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीची दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.
दरम्यान जिल्ह्यात नागरी क्षेत्राच्या हद्दीतील सर्व कापड बाजार, आठवडे बाजार, मॉल्स, व्यापारी संकुल, क्रीडा संकुलमध्ये सर्व दुकाने बंद राहणार ठेवण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणी दुकाने सुरू राहणार आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक दुकानदाराने सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे नियम पाळावे. दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना मास्क आवश्यक असून खरेदी-विक्री करताना त्याचा वापर अनिवार्य. दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी. थुंकणार्यांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी. दुकानांमध्ये गर्दी आढळल्यास ते सील करून संबंधित दुकानदारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.