मुंबई – राजस्थान येथील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास 100 बस धुळ्यातून जातील. पुढील दोन दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी होईल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले आहे.
संचारबंदीमुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहे. महाराष्ट्र सरकारने आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ते सातत्याने करत होते. त्यानंतर महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला आहे.