नवी दिल्ली : महाभारताचे युद्ध जिंकण्यास १८ दिवस लागले; कोरोनाचे युद्ध २१ दिवसांत जिंकू असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी वाराणसीतील जनतेशी संवाद साधतांना केला.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतील जनतेशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधताना ते बोलत होते. देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाउनची घोषणा केली. त्यानंतर आज आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीत मोदी म्हणाले, हा आजार लोकांमध्ये भेदभाव करत नाही, श्रीमंत किंवा गरीब दोघांनाही लागण होऊ शकते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले कि, महाभारताचे युद्ध १८ दिवसांत जिंकले गेले होते. आज करोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशात लढले जात आहे. यासाठी २१ दिवस लागणार आहेत. आपला प्रयत्न आहे की हे युद्ध आपण २१ दिवसांतच जिंकायचं आहे. आपल्या १३० कोटी जनता जनार्दनाच्या जोरावर आपल्याला कोरोनाविरोधातील ही लढाई जिंकायची आहे. यामध्ये काशीवासियांची देखील मोठी भूमिका असेल.