पंचवटी । मुंबई-आग्रा महामार्गावरील आडगाव शिवारातील 9 व्या मैलावर नाशिकच्या दिशेने येणार्या चारचाकी वाहनाला सोमवारी रात्रीच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात मायलेकी जागीच ठार झाल्या असून अत्यवस्थ असलेल्या एका महिलेचा उपचार सुरू असताना मंगळवारी मृत्यू झाला. तर बाप-लेक गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहन अक्षरशः चक्काचूर झाले.
पुणे येथील हिमाल सोसायटी येथे राहणारे शहा कुटुंबीय सोमवारी रात्री मालेगावकडून नाशिकच्या दिशेने चारचाकी (एमएच 14, एक्स 6301) वाहनाने येत होते. रात्री 1 वाजेच्या सुमारास आडगाव शिवारातील मुंबई-आग्रा महामार्गावरील 9 वा मैल परिसरात शेर-ए-पंजाब हॉटेलसमोर भीषण अपघात झाला. ही चारचाकी या ठिकाणी उभा असलेल्या (आरजे 36, एक्स 7578) ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, चारचाकी वाहनाचा चक्काचूर झाला.
वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या अपघातात नीना सागर शहा (44) व
संजना सागर शहा (वय 19) या माय लेकी जागीच ठार झाल्या. अत्यवस्थ असलेल्या शहा कुटुंबातील विद्या बाळू थोरात यांचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.