
मुंबई । Mumbai
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी दाखला असल्याचं विधान करत काही दिवसांपूर्वी वादाची ठिणगी टाकली होती. नंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त करत त्या प्रकरणावर पडदा टाकला. मात्र, हा वाद शमतो न शमतो तोच आता ओबीसी आंदोलक नेते लक्ष्मण हाके यांनी थेट आमदार रोहित पवार यांच्याबाबत नवा दावा करत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिली आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना लक्ष्मण हाके म्हणाले, “सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी दाखला आहे की नाही, हे मला माहित नाही. मात्र, आमदार रोहित पवार यांच्याकडे ओबीसीचा दाखला नक्की आहे. सुप्रिया सुळेंनी उगाच विनाकारण स्पष्टीकरणं देण्याची गरज नाही. रोहित पवारांचा दाखला समोर आल्यानंतर सुप्रिया सुळे यांचाही ओबीसी दाखला निघेल,” असा खळबळजनक दावा हाके यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.
यावेळी लक्ष्मण हाके यांनी येत्या १ सप्टेंबर रोजी मुंबईत निघणाऱ्या ओबीसी समाजाच्या भव्य मोर्चाबाबत प्रशासनाला इशारा दिला. “आम्ही मोर्चाच्या परवानगीसाठी सरकारला रीतसर निवेदन दिले आहे. परंतु, पोलीस सहसा अशा मोर्चांना परवानगी देत नाहीत. आम्हाला आंदोलनांचा मोठा अनुभव आहे. जर सरकारला वाटत असेल की ओबीसींनी आंदोलन करू नये, तर त्यांनी आम्हाला उचलून थेट तुरुंगात टाकावे. पण आम्ही मुंबईत मोर्चा घेऊन जाणारच,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर भाष्य करताना हाके यांनी जोरदार हल्लाबोल केला. “मराठा आरक्षणाचा लाभ गरजूंपेक्षा विखे पाटील, रोहित पवार आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या प्रस्थापित नेत्यांनीच घेतला आहे. २००४ सालापासून ओबीसी आरक्षणावर दरोडा टाकण्याचे काम सुरु आहे. मात्र, त्याला अधिकृत करण्याचे काम मनोज जरांगे यांच्यासारख्या व्यक्तीने केले आहे,” अशी घणाघाती टीका हाके यांनी केली.
दुसरीकडे, मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे. हे त्यांचे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन असल्याचे मानले जात आहे. आंदोलकांनी मुंबईकडे कूच करण्याचा आग्रह धरला असून जरांगे यांनीही मुंबईला धडक देण्याचे संकेत दिले आहेत. एका बाजूला जरांगेंचे उपोषण आणि दुसऱ्या बाजूला १ सप्टेंबरला हाकेंचा मुंबईतील मोर्चा, यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.




