मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु आहे. एकीकडे विविध पक्ष युती-आघाडी करत असताना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात दुफळी निर्माण झाली आहे. पालिका निवडणुकीसाठी मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट एकत्र आले आहेत, तर अजित पवार गट मुंबईत स्वतंत्र लढत असून त्यांनी रविवारी (२८ डिसेंबर) रोजी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तर दुसरीकडे पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याची घोषणा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२८ डिसेंबर) केली. तसेच पुण्यात सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
जेव्हा दोन पेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाण घेवाण होते त्यात ज्यांच्या जागा जातात अशा जागांमधील जे कोणी प्रमुख लोक असतात जे इच्छुक होणार ते अस्वस्थ होणारच, भाजपमधील, शिंदे गटात असतील. अजित पवार यासाठीच स्वतंत्र लढत आहेत. पण कार्यकर्त्यांना समजून सांगतील तर ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे ऐकतील. पण ज्या कोणाला असे वाटते की माझ्यावर अन्याय झाला तो राग व्यक्त करतो. त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. असे कुठे झाले, असे तर मला काही वाटत नाही, असे संजय राऊतांनी म्हटले.
युती घोषित करण्याचा आग्रह का?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि मनसेसोबत आहे, असं म्हटलं जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तुमच्यासोबत आहे, असे अधिकृतरित्या तुम्ही आज जाहीर करणार का? असा प्रश्न विचारला असता, संजय राऊत म्हणाले की, घोषित करायला कशाला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. त्यामुळे घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या, त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे युती झालेली आहे.
तसेच शरद पवार गटाला हव्या पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. तुम्ही आम्ही त्यांना सांगितले की, तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडून हा विषय आम्ही संपवला आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.
शरद पवारांनी उत्तर दिलं पाहिजे
संजय राऊत म्हणाले की, पिंपरी-चिंचवडपुरता हा मर्यादीत मुद्दा आहे. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादींची युती झालेली नाही, असे मला वाटते. त्यामुळे अजित पवारांना भाजपाला आणि अमित शहांना उत्तर द्यायचे आहे. ज्या शरद पवारांविरोधात भाजपा लढत आहे, अशा शरद पवार गटासोबत अजित पवार युती करत असतील, त्यांना अमित शहांना उत्तर द्यावे लागेल. तसेच ज्या भाजपाला नेहमीच शरद पवार गटाने विरोध केला, आज त्याच भाजपासोबत असलेल्या अजित पवारांसोबत शरद पवार का जात आहेत? याच उत्तर त्यांनी दिले पाहिजे. त्यामुळे तुम्ही त्यांना प्रश्न विचारा, मला कशाला प्रश्न विचारत आहात? असा प्रतिप्रश्न संजय राऊत यांनी केला.





