अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
प्रयाग राज महाकुंभ मेळा यात्रेसाठी नगर शहर व जिल्ह्यातून गेलेल्या शेकडो यात्रेकरूंना बुधवारी मौनी अमावस्येच्या दिवशी शाही स्नानाची संधी मिळाला. मात्र, त्यानंतरही ही सर्व मंडळी परतीच्या वाटेवर असतांना गुरूवारी पहाटेपासून दिवसभर प्रयाग राजमध्येच अडकून पडली आहेत. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत स्थानिक प्रशासनाकडून मदत न मिळाल्याने नगर शहरासह तालुक्यातील विविध गावातील 20 ते 25 जणांनी पुढाकार घेत स्वयंसेवकांची भूमिका बाजावत गर्दीत मार्ग काढत याठिकाणी ठप्प झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
दरम्यान, नगरचे जिल्हा प्रशासन प्रयाग राजमधील महाकुंभच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांनी स्वत: प्रयाग राजमधील स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधत मिळणार्या मदत कार्याची माहिती घेतली. तसेच मुंबईच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन यांची संपर्क साधत नगर जिल्ह्यातून महाकुंभसाठी गेलेल्या भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. प्रयाग राजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत नगरमधील कोणीही जखमी झाले नसले तरी याठिकाणी गर्दीच्या महापुरात अनेकजण अडकले असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, मौनी अमावस्यानंतर प्रयाग राजमधील गर्दीने रौद्र रुप धारण केलेले असून प्रयाग राजच्या 50 ते 60 किलो मीटर परिसारात सर्वत्र वाहतूक कोंडी झाली असून यात लाखो भाविक अडकून पडले होते.
दहा ते बारा तासात 3 ते 5 किलो मीटर अंतर कापले जात आहे. या ठिकाणी भाविकांना पिण्याचे पाणी व अन्नही मिळत नव्हते. पाण्याची बाटली 50 रुपयांना घ्1यावी लागत होती. मंगळवारी रात्री उशिरा मौनी अमावस्येला पहाटे कुंभमेळा येथे झालेल्या चेंगराचेंगरी अपघातात 30च्यावरजण मरण पावले. त्यानंतर सर्व आखाड्यातील साधूंचे मिरवणुकीने होणारे शाही स्नान साधेपणाने करण्याचा आखाड्यांचा निर्णय झाला. यावेळी जखणगाव (ता. नगर) येथून गेलेल्या 150 च्यावर भाविकांना प्रयागराज त्रिवेणी संगम घाटावर शाहीस्नानाची संधी मिळाली. डॉ. सुनील गंधे यांच्या नेतृत्वाखाली प्रयाग राजला गेलेल्या भाविकांच्या आरोग्य महाकुंभ दिंडीत नगरसह संभाजीनगर, पुणे, मुंबई, बीड, नाशिकसह संपूर्ण राज्यभरातून आरोग्य दिंडी प्रयाग राजला गेली होती.
या दिंडीचे शाहीस्नान झाल्यावर परतीचा प्रवास करताना प्रयागराजमध्ये भाविकांची दिंडी अडकली आहे. यामध्ये जवळपास पाच किलोमीटरपर्यंत कुठेही पाणी व अन्नाची व्यवस्था नाही. भाविकांची उपासमार सुरू असून, त्यांना मदतीची विशेषतः अन्न-पाण्याची नितांत गरज असल्याचे डॉ. गंधे यांनी सांगितले. याठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांची व्यवस्था करण्यास प्रशासनाकडून योग्य ती तयारी केल्याचे दिसून आले नाही. पार्किंग व्यवस्थेमध्ये सुद्धा अस्ताव्यस्तपणा व अनियमित्ता दिसून आली. दुर्दैवाने या परिसरात कुठलेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा छोटी टपरी किंवा साधी पाण्याची व्यवस्था नाही, असे गंधे यांनी सांगितले. मात्र, यावेळी परिस्थितीचे गांर्भिय ओळखून नगर शहर जखणगाव, हिवरेबाजार गावातील 20 ते 25 तरूणांनी स्वत: हून स्वयंसेवकांची भूमिका बाजावत वाहतूक पोलिसांप्रमाणे गर्दीची कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. गुरूवारी रात्री 9 पर्यंत हजारो गाड्यांना या गर्दीत परतीच्या मार्गे रवाना करण्यात यश आले असल्याचे गंधे यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, प्रयाग राजमधील परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून असून अनेकांशी संपर्क झाला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.