जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
सर्वासाठी घरे -2022 या केंद्र शासनाच्या धोरणांतर्गत 20 नोव्हेंबर 2020 ते 28 डिसेंबर 2021 या 100 दिवसांच्या कालावधीत राज्य शासनामार्फत जिल्ह्यातील सर्व घरकुल योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता महाआवास अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यशाळेचा शुभारंभ ऑनलाईन कार्यशाळेच्या माध्यमातून पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.
या ऑनलाईन कार्यशाळेस जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील,खासदार,आमदार, सभापती,उपसभापती ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते.
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जि.प. सीईओ डॉ. बी.एन.पाटील, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी,गटविकास अधिकारी उपस्थित होते. आभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक गणेश चौधरी यांनी मानले.
शासन निर्णयानुसार ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आवास योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना या सर्व योजनांतील उदीष्टाप्रमाणे घरकुलाना मंजुरी देवून सर्व घरकुले दि.28 फ्रेबुवारी 2021 पर्यत पूर्ण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महाआवास अभियानांतर्गत जिल्ह्यातील भूमिहीन लाभार्थीना जागा उपलब्ध करून देणे, सर्व प्रलंबित असलेले सर्व घरकुले पूर्ण करणे, घरकुल बांधकामासाठी गवंडी प्रशिक्षण राबविणे, प्रत्येक तालुक्यासाठी पथदर्शके, घरकुलांचे पंचायत समित्यांचे आवारात बांधकाम करणे यासंदर्भात मार्गदर्शन केले.
दीड लाखांचे अनुदान
घरकूल लाभार्थ्याना शासनाचा विविध योजनाचे कृतीसंगम करून लाभ देण्यास प्राधान्यक्रम देवून आदर्श व नाविण्य पूर्ण घरकुले निर्माण करणे, घरकुलाचा माध्यमातून बहुआयामी इमारती स्थापन करणे, त्यात बचत गटांच्या लाभार्थांना प्राधान्य देणे, विविध सेवाभावी संस्था, बँका यांचे सहकार्य घेणे, ग्रामीण गृहनिर्माण योजनेत लाभार्थ्याना प्रती घरकुल रक्कम रू 1.50 लक्ष देय असून बँकांकडून विनातारण अतिरिक्त 70 हजार रु. कर्ज स्वरूपात लाभार्थ्याना उपलब्ध करून देण्यात येत आहे.