मुंबई | Mumbai
बीडच्या (Beed) परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांची अतिशय अमानुषपणे काही आरोपींनी हत्या केली होती. या हत्येप्रकरणी त्यांचे कुटुंबिय न्यायासाठी लढत आहेत. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी आपल्या पतीच्या हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आंदोलन केले. तसेच त्यांनी आंदोलनात विषप्राशन करुन स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला. त्यातच आता महादेव मुंडे यांच्या हत्येचा शवविच्छेदन अहवाल आला असून, त्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या शवविच्छेदन अहवालात आधी त्यांचा गळा कापला असल्याचे म्हटले आहे. यात तब्बल २० सेमीपर्यंत लांब, ८ सेमी रुंद आणि ३ सेमी खोल असा हा वार होता. त्यानंतर त्यांच्या मानेला उजव्या बाजूने चार वार करण्यात आले. तर प्रतिकार करतानाही त्यांच्या हाताला जखमा झाल्या असून, महादेव मुंडे यांच्या अंगावर एकूण १६ वार करण्यात आल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
तसेच महादेव मुंडे यांच्या शरीरावर (Body) उजव्या बाजूला ४ वार होते, तर तोंडापासून गालापर्यंत १ आणि उजव्या हातावर ३, डाव्या हातावर ३ , गळ्यावर ३, तोंडावर १ आणि नाकावर १ वार करण्यात आला होता, अशी माहिती शवविच्छेदन अहवालात देण्यात आली आहे. तर मुंडे यांच्या गळ्यावर समोरुन वार केल्यमुळे श्वसननलिका कापली गेली आणि रक्तवाहिन्याही तुटल्या. यामुळे अतिरक्तस्त्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू (Death) झाला, असल्याचे अहवालात म्हटले आहे.
बाळा बांगरचे धक्कादायक खुलासे
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते बाळा बांगर (Bala Bangar) यांनी पत्रकार परिषद धक्कादायक खुलासे केले आहेत. यात त्यांनी म्हटले की, “महादेव मुंडे यांच्यावर धारधार शस्त्रांचे वार करून हत्या करण्यात आली. मुंडे यांच्यावर पळत ठेवून हत्या करण्यात आली असून, त्यांना खाली पाडून पायावर वार करण्यात आले. ते ओरडू लागल्याने गालावर आणि गळ्यावर वार करण्यात आल्याचे बांगर यांनी म्हटले आहे.
महादेव मुंडे यांच्यावर श्री कराड आणि वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्या साथीदारांनी वार केले असून, त्यांच्या शरीरावर २१ वार आहेत. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. महादेव मुंडे खून प्रकरणात विशेष तपास पथक नियुक्त केले आहे. पण त्यामध्ये आयपीएस अधिकारी नाही. त्यामुळे आयपीएस अधिकारी नियुक्त करावा, अशी आमची मागणी आहे, असेही बाळा बांगर यांनी सांगितले.
ज्ञानेश्वरी मुंडे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ शोधण्यात याव अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर मनोज जरांगे पाटलांनी आपण कायम सोबत असून, जोपर्यंत आरोपींना अटक करत नाहीत तोपर्यंत हा लढा चालू ठेवू जिल्हा काय राज्य बंद करण्याची वेळ आली तरी बंद करू असा शब्द दिला होता. त्यानंतर आज ज्ञानेश्वरी मुंडे यांनी कुटुंबीय व नातेवाईकांसह अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली.




