मुंबई | Mumbai
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे (दि.२८ जानेवारी) रोजी विमान अपघातात (Accident) बारामती येथे मृत्यू झाला होता. यानंतर (दि.२९ जानेवारी) रोजी त्यांच्या पार्थिवावर बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांची ‘कलश यात्रा’ काश्मीर ते कन्याकुमारी अशी आयोजित करण्यात आली होती. बारा राज्यांमधून जाणारी ही यात्रा आज (रविवारी) अजित पवारांचे पुत्र जय पवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीत प्रयागराज येथील त्रिवेणी संगमावर समाप्त झाली.
आज तीर्थक्षेत्र प्रयागराज (Prayagraj) येथील गंगा-यमुना-सरस्वतीच्या त्रिवेणी संगमावर राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिकलशाचे कुटुंबीयांच्या उपस्थितीत विधीवत पूजन करून पुत्र जय पवार यांच्या हस्ते अस्थी विसर्जन करण्यात आले.राष्ट्रवादी परिवाराच्या वतीने काश्मीर ते कन्याकुमारी अशी काढण्यात आलेली देशव्यापी ‘अस्थिकलश यात्रा’ आज विधीवतरीत्या पूर्णत्वास गेली. हरिद्वार येथून प्रारंभ झालेल्या या राष्ट्रव्यापी यात्रेचा भावनिक समारोप प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा (Dhiraj Sharma) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या समारोपप्रसंगी संगम घाटावर उपस्थित असलेल्या नागरिकांच्या डोळ्यांतून अजित पवारांविषयी प्रेम, आदर आणि सन्मान स्पष्टपणे दिसून आला. याप्रसंगी राष्ट्रीय सचिव धनंजय शर्मा, उत्तरप्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हरिश्चंद्र सिंग, उत्तरप्रदेशातील भाजपचे प्रमुख नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, अस्थी विसर्जनासाठी जय पवार (Jay Pawar) यांच्यासह कुटुंबीय पुण्याहून चार्टर्ड विमानाने प्रयागराजला पोहोचले होते. यानंतर जय पवार यांनी विमानतळावरून संगमावर ताफ्यासह प्रवास केला.सुमारे दोन तास संगमावर घालवत विधीनुसार अस्थी विसर्जन केले. त्यानंतर जय पवार कुटुंबियांसह विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी जय पवार अजितदादांच्या आठवणीत भावूक झाल्याचे बघायला मिळाले.





