नाशिक | Nashik
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात (Sangareddy District) काही समाजकंटकांनी महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करत पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांना पिटाळून लावले. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात असून, ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आक्रमक झाले असून, त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
छगन भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला असल्याचे म्हटले आहे. तसेच पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी या गंभीर प्रकरणात जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे. त्यामुळे आता अमित शाह (Amit Shah) दोषींवर काय कारवाई करतात? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रकाश आंबेडकरांनी केला संताप व्यक्त
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, हा केवळ महात्मा ज्योतीबा फुले यांच्यावर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो. संघाचं केवळ मनुवाद आणि ब्राह्मणवादावर प्रेम आहे. हा हल्ला वंचितांच्या आणि बहुजनांच्या समतेच्या चळवळीवरील आघात आहे, असे त्यांनी म्हटले आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी (Telangana CM Revant Reddy) अशा घटना वारंवार घडत असताना हात बांधून गप्प का बसले आहेत? असा सवालही त्यांनी केला.





