मुंबई | Mumbai
महायुती सरकारला (Mahayuti Government) राज्यात सत्तेत येऊन शंभरहून अधिक दिवस झाले आहेत. परंतु, नाशिक आणि रायगडच्या (Nashik and Raigad) पालकमंत्रीपदाचा तिढा काही सुटलेला नाही. त्यानंतर आता हा गुंता आणखी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारकडून महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर या दोन्ही जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून कोण झेंडा फडकणार याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन आणि रायगड जिल्ह्यात मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडा फडकवला जाणार आहे. मात्र, यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याचे दिसत आहे.
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी (Guardian Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची शिवसेना आग्रही होती. यामध्ये नाशिकसाठी दादा भुसे (Dada Bhuse) आणि रायगडसाठी मंत्री भरत गोगावले आग्रही होते. मात्र या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे नाशिकच्या पालकमंत्रीपदी दादा भूसे यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. यामुळे महायुतीत जोरदार वाद होऊन नाराजीनाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले होते.
दरम्यान, मध्यंतरी नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या दरबारी देखील गेला होता. पण त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. यानंतर आता ०१ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी कोणता मंत्री कुठल्या जिल्ह्यात झेंडा फडकवणार याची यादी समोर आल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तसेच महाजन आणि तटकरे यांना आधी नियुक्ती झालेल्या जिल्ह्यातच झेंडा फडकविण्याचा मान मिळाल्याने या दोन्ही मंत्र्यांच्या गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडणार का? अशी चर्चा राजकीय (Political) वर्तुळात रंगू लागली आहे.
कोण कुठल्या जिल्ह्यात करणार ध्वजवंदन?
- एकनाथ शिंदे- ठाणे
- अजित पवार- पुणे
- चंद्रशेखर बावनकुळे- नागपूर
- राधाकृष्ण विखे-पाटील- अहिल्यानगर
- चंद्रकांत पाटील- सांगली
- गिरीश महाजन- नाशिक
- गणेश नाईक- पालघर
- गुलाबराव पाटील- जळगाव
- दादा भुसे- अमरावती
- संजय राठोड- यवतमाळ
- मंगलप्रभात लोढा – मुंबई शहर
- उदय सामंत – रत्नागिरी
- जयकुमार रावल – धुळे
- पंकजा मुंडे – जालना
- अतुल सावे – नांदेड
- अशोक वुईके – चंद्रपूर
- शंभूराज देसाई- सातारा
- अॅड. आशिष शेलार – मुंबई उपनगर
- दत्तात्रय भरणे- वाशिम
- आदिती तटकरे- रायगड
- शिवेंद्रसिंह भोसले – लातूर
- अॅड. माणिकराव कोकाटे – नंदूरबार
- जयकुमार गोरे – सोलापूर
- नरहरी झिरवाळ – हिंगोली
- संजय सावकारे – भंडारा
- संजय शिरसाट- छत्रपती संभाजीनगर
- प्रताप सरनाईक- धाराशिव
- मकरंद जाधव (पाटील)- बुलढाणा
- नितेश राणे – सिंधुदुर्ग
- आकाश फुंडकर – अकोला
- बाबसाहेब पाटील – गोंदिया
- प्रकाश आबिटकर- कोल्हापूर
- आशिष जयस्वाल- गडचिरोली
- पंकज भोयर- वर्धा
- मेघना बोर्डीकर- परभणी
- इंद्रनील नाईक- बीड