मुंबई | Mumbai
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (Local Body Election) पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची (MNS and Shivsena UBT) युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर ठाकरेंची शिवसेना मनसेसोबत गेल्यास महाविकास आघाडीचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानामुळे राज ठाकरेंचा पक्ष मविआसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
खासदार राऊत यांनी आज (सोमवारी) माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीच्या मनोमिलनाबाबत सूतोवाच केले आहे. ते म्हणाले की, “राज ठाकरे यांनी आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला (Congress) सोबत घेणे गरजेचे असल्याची इच्छा व्यक्त केली आहे. प्रत्येकाचे या राज्यात एक स्थान आहे. शिवसेना (ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) या पक्षांसह डाव्या पक्षांचे स्थान आहे. तसेच काँग्रेस हा देखील राज्यातील एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना शिष्टमंडळात काँग्रेसचा समावेश होणे गरजेचे असल्याची आमची भूमिका असून, तिचं राज ठाकरे यांची देखील आहे ,” असं राऊत यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत (Delhi) असून, त्यांच्या नेतृत्वाला याठिकाणी निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटले. तसेच ज्यांचे नेतृत्व दिल्लीत आहे ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील असं देखील त्यांनी म्हटले.
दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू मराठीच्या मुद्द्यावर ५ जुलैच्या मेळाव्यात एकत्र आले होते. तेव्हापासूनच दोन्ही बंधूंमध्ये युतीची चर्चा सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतरही दोन्ही बंधूच्या भेटीगाठी झाल्या. अगदी काल (रविवार दि.१२ ऑक्टोबर) रोजी देखील राज ठाकरेंनी सहकुटुंब उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. यावेळी दोन्ही बंधूंनी एकत्र स्नेहभोजन केल्याची देखील चर्चा आहे. त्यानंतर आता राज ठाकरेंनीच आगामी निवडणुकांसाठी एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.




