नागपूर | Nagpur
नागपूर, वर्धा आणि गडचिरोलीसह विदर्भातील जिल्ह्यांना (Vidarbha District) संततधार पावसाने अक्षरश:झोडपून काढले आहे. रविवरी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही थांबलेला नसून, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातही (District) पूरस्थिती गंभीर बनली असून, गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे.
नागपूर जिल्ह्यात (Nagpur District) गेल्या ६० तासांत सुमारे १७२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज असून, शाळांना (School) सुट्टी देण्यात आली आहे. तर वर्धा जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, अनेक ठिकाणी लोक पुराच्या पाण्यात अडकल्याने त्यांच्यासाठी मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले आहे.
तसेच नागपूर, गडचिरोली,चंद्रपूर, गोंदियासह वर्धा जिल्ह्यांना पावसाचा (Rain) मोठा फटका बसला आहे. अनेक नद्या दुथडी भरून वाहत असून, पूल देखील वाहून गेले आहेत. तसेच नागपूर जिल्ह्यातील अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याशिवाय अनेक तालुक्यातील रस्त्यांना देखील पुराचा फटका बसल्याची माहिती नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर हिंगणघाट, देवळी तालुक्यातील (Devli Taluka) अनेक गावांचा संपर्क तुटल्याचे त्यांनी सांगितले.
दुसरीकडे विदर्भातील मुसळधार पावसामुळे सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूरमधील (Nagpur) परिस्थितीचा आढावा घेतला आहे. नागपूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा नेत्र विभाग पाण्याखाली गेला आहे. तसेच नरसाळा भागात पोहरा नदीने रौद्ररूप धारण केल्याने अनेक घरांमध्ये नागरिक अडकले आहे. तर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाकडून बोटींच्या साहाय्याने बचावकार्य सुरू असून, अजूनही १० ते १२ लोक घरात अडकले असण्याची शक्यता आहे.
गोंदियात अनेक गावांचा संपर्क तुटला
गोंदिया जिल्ह्यात (Gondiya District) मागील तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहे. काही ठिकाणी नाल्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा तालुक्याशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांनी शेतात केलेली रोवणीही पाण्याखाली गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
वर्धा जिल्ह्यातही पूर परिस्थिती
पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात अतिमुसळधार पाऊस झाला आहे. आज (बुधवारी) या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच गोंदियाचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला आहे. त्यासोबतच वर्धा जिल्ह्यात नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यशोदा नदीच्या पुरामुळे सरूळ येथे पुलावरून पाणी वाहत असल्याने वर्धा-राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.




