मुंबई | Mumbai
राज्यातील महायुतीमध्ये धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. मंगळवारी (१८ नोव्हे) मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याची माहिती समोर आली आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच उपस्थित होते. शिंदे गटाचे मंत्री मंत्रालयात उपस्थित होते. मात्र, त्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार घातला असल्याचे समोर आले आहे.
कल्याण डोंबिवलीतील मिशन ऑपरेशन लोटसवरून शिवसेना शिंदेगटात नाराजी पसरली आहे. स्थानिक पातळीवर अनेक ठिकाणी शिंदेसेनेविरोधात भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे. त्यात रायगड येथेही अजित पवारांना सोबत घेऊन शिंदेसेनेविरोधात भाजपने आघाडी केली आहे. त्यात कल्याण डोंबिवलीत एकमेकांकडे पदाधिकारी, नेते आपल्या पक्षात आणण्यासाठी दोन्ही पक्ष प्रयत्नशील आहे. त्यात आज डोंबिवलीतील दिवंगत वामन म्हात्रे यांचे सुपुत्र अनमोल म्हात्रे, अश्विनी म्हात्रे यांच्यासह अनेक कार्यकर्ते भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्य मंत्रिमंडळाची नियोजित बैठक होती. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी प्रत्येक पक्षाची प्री-कॅबिनेट बैठक होते. शिंदे गटाच्या प्री-कॅबिनेट बैठकीत शिवसेनेचे सगळे मंत्री उपस्थित होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला यापैकी एकही मंत्री गेला नाही. केवळ एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. शिवसेनेच्या उर्वरित मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. कॅबिनेटची बैठक आटोपल्यानंतर शिवसेनेचे सर्व मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात पोहोचत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपमध्ये होत असलेले पक्षप्रवेश, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांतील जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वाकडून डावलण्याच्या भावना या मुद्द्यांवरून शिवसेना मंत्र्यांमध्ये मोठी नाराजी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला शह देण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे गटातील नेत्यांना भाजपात प्रवेश देण्यासोबतच भाजपकडून शिंदे गटाला आव्हान देणाऱ्या नेत्यांनाही पक्षात प्रवेश दिला जात आहे. त्यावरून शिंदे गटात मोठी नाराजी असल्याची दिसून येत आहे.
त्यातच ठाणे, पालघर, कल्याण भागातील शिंदे गटाचे पदाधिकारी प्रचंड नाराज आहेत. गेल्य काही दिवसांपासून गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाण्यात जनता दरबार घेण्याचा सपाटा लावला आहे. तर रवींद्र चव्हाण यांनी शिवसेनेच्या नगरसेवकांना गळाला लावून मानाने भाजपमध्ये प्रवेश दिला होता. यामुळे शिंदे गटामध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्यातच काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याअसून भाजपकडून सुरु असलेला पक्ष प्रवेशावर हा सगळ्या घडामोडींवर शिंदे गट प्रचंड नाराज असल्याचे समजते.
शिंदे गटाचे हे मंत्री अनुपस्थित
आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीसाठी शिवसेना शिंदे गटातील उदय सामंत प्रताप सरनाईक, दादा भुसे, संजय शिरसाट, प्रकाश आबिटकर, भरत गोगावले, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील हे मंत्री अनुपस्थित होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




