चांदवड | प्रतिनिधी chandwad
राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत चांदवड नगरपरिषदेला राज्यात तिसरा क्रमांक मिळाला असून नगरपरिषदेला दोन कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आलेल्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमांच्या उत्कृष्ट अंमलबजावणीमुळे हा बहुमान मिळाला.
पुरस्कार वितरण सोहळा मुबंईत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पर्यटन मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे सभापती राहुल नार्वेकर तसेच अभियानाचे संचालक सुधाकर बोबडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी रमाकांत डाके, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, माजी नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, नगराध्यक्ष वैभव बागुल तसेच स्वच्छता निरीक्षक विजय सोनवणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
या अभियानांतर्गत शहरात व्यापक वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन, स्वच्छता मोहिम, प्लास्टिक मुक्ती अभियान, पाणी संवर्धन व जल पुनर्भरण प्रकल्प, नवीकरणीय ऊर्जेचा वापर, इलेट्रिक वाहनांचा प्रसार तसेच जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात आले. शहरातील शाळा, व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागामुळे पर्यावरण संवर्धनाची चळवळ व्यापक झाली. या यशाबद्दल शहरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व अधिकारी, सेवक आणि नागरिकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





