श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्रीरामपूर शहर आणि तालुक्याला नेतृत्वाच्या चेहऱ्याचा अभाव असल्याने, शहर आणि तालुक्याचा विकास मागे पडला आहे. विधानसभेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. स्व. जयंत ससाणे यांच्या नंतर चेहरा निर्माण होऊ शकला नाही, त्याचा परिणाम शहर आणि तालुक्याच्या विकासावर झाला आहे. मात्र, आगामी नगरपालिका निवडणुकीत भाजपा आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर श्रीरामपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण करणार आहोत. त्यासाठी श्रीरामपूरचे पालकत्व आपण स्विकारले आहे. आणि आजपासूनच त्या कामाला सुरुवात केली आहे. गुन्हेगारीमुक्त श्रीरामपूर करण्याचा निर्धार आपण केला असून लवकरच श्रीरामपुरात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
आगामी नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक उत्सव मंगल कार्यालयात झाली, तर शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची बैठक लक्ष्मीनारायण हॉटेल येथे झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. विखे बोलत होते. व्यासपीठावर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती दीपक पटारे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे आदी उपस्थित होते.
पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. विखे म्हणाले, शहराच्या विकासाचा आम्ही निर्धार केला आहे. शहरात महायुती झाल्यास उत्तमच, नाही झाल्यास आम्ही आमचा चेहरा घेऊन मतदारांसमोर जाणार आहोत. श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी जो जाहीरनामा पुढच्या पाच वर्षांसाठी आम्ही तयार करणार आहोत, त्यामध्ये शहराच्या विकासाचा संपूर्ण आराखडा आम्ही देणार आहोत.
श्रीरामपुरात भाजपकडून संजय फंड आणि श्रीनिवास बिहाणी या दोन नावांची नगराध्यक्षपदासाठी चर्चा असताना ऐनवेळी तिसरा चेहरा समोर येणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, निवडून येण्याची क्षमता असलेले कोणी पक्षात येत असेल तर त्याचे आम्ही स्वागत करु. श्रीरामपुरात मोठा राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, राजकीय भूकंप होणार आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी ठामपणे सांगितले.
शहरातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विस्थापितांचे पुनर्वसन करण्यासाठी शेती महामंडळाच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स, नगरपालिका नवीन बिल्डिंग, नवीन बस स्टँड, नवीन स्टेडियम इत्यादी सर्व तरतुदी आपण केल्या आहेत. शहराच्या शासकीय जागा आहेत, त्यांचे मूल्यांकन जास्त असल्यामुळे त्या जागा आपल्याला मिळतीलच असे नाही. परंतु, शहरासह उपनगरे देखील विकसित झाली पाहिजेत, जसे अहिल्यानगरमध्ये केडगाव, बोल्हेगाव या ठिकाणी आपण विकासकामांना सुरुवात केली आहे, त्याच धर्तीवर श्रीरामपुरात देखील काम करणार आहे.
नगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली, तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आपण शहरात कार्यान्वित करू. बीओटी धोरणावर बस स्टँडचा विकास होऊ शकेल. यासंबंधी आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून त्यासाठी विशेष निधी मिळवू. श्रीरामपूरसाठी आम्ही नवीन रणनीती तयार केली आहे. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकीट देऊ. अनेक नगरसेवक आमच्या पक्षात आले आहेत. अजूनही काही येणार आहेत. त्यांना सुद्धा सामावून घेऊ. शिर्डीप्रमाणे श्रीरामपूर शहरामध्ये महा-सिक्युरिटी योजना राबवू, सुरक्षा कर्मचारी नियुक्त करू, शहरामध्ये गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्षभरात त्याचा विरुध्द उपाय करू आणि शहर स्वच्छ करू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. एमएसएफ नियुक्त करताना शिर्डीप्रमाणे घराघरातून सर्वेक्षण करण्यात येईल, आणि नागरिकांच्या मतानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
शहरामध्ये अनेक इच्छुक फिक्स नगरसेवक, भावी नगरसेवक असे बोर्ड लावत असल्याचे त्यांना विचारले असता, बोर्ड लाऊन किंवा फराळ वाटले म्हणून तिकीट मिळेल असे नाही, भावी शब्द ज्यांनी लावला ते संपले आहेत, असे मुश्किलपणे त्यांनी सांगितले. फ्लेक्स बोर्ड बंदीचा विषय आला असता भविष्यात याबाबत निश्चितपणे आपण धोरण राबवू, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या विषयावर आपण काम केले आहे. नजीकच्या काळात शहराचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी अनेक योजना आपल्याकडे आहेत. त्यासाठी शहरातील मतदारांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
अहिल्यानगरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही दुकानदारांनी भगवे झेंडे लावले होते, त्याबाबत प्रश्न विचारला असता, धर्माच्या आधारावर मते मागण्याऐवजी विकासाच्या मुद्यावर मतदान व्हावे, याला आपण नेहमी प्राधान्य दिले आहे. लोकसभेला ठराविक समाजाने वेगळा निर्णय घेतला, त्याची प्रतिक्रीया विधानसभेत उमटली. आता हे कुठे तरी थांबवण्यासाठी सुरुवात ज्यांनी केली, तेच अंतही करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. शहरामध्ये महायुती होणार का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी महायुती करण्याची आमची इच्छा असल्याचे सांगितले. मात्र, मित्र पक्षांमधील नेमक कोणाशी बोलायच हा मोठा प्रश्न आहे, कारण माहितीच्या इतर मित्र पक्षांमध्ये शहरात अनेक गट आहेत. त्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नेमकी चर्चा कुणाशी करायची याचा शोध घ्यावा लागेल, असे सांगून महायुतीसाठी मी कुणाच्याही दारावर जायला तयार आहे. जे आमच्यातून गेले त्यांच्यावर टीका-टिप्पणी करण्यात जास्त रस नाही. मी कुणाचाही द्वेष करत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे त्यांनी सांगितले.
जे लोक पक्षाला सोडून गेले आहेत, त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, जे गेले त्यांचे आमच्या पक्षासाठी निश्चितपणे योगदान होते. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. माझ्यावर कुणी कितीही टीका केली, तरी मी त्याबद्दल नाराज नाही. मात्र माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होणार असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोलाही त्यांनी शेवटी प्रकाश चित्ते यांचे नाव न घेता लगावला.




