मुंबई | Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आज (मंगळवारी) त्यांच्या आंदोलनचा पाचवा दिवस असून, त्यांना आझाद मैदान रिकामं करावं, अशी नोटीस मुंबई पोलिसांनी दिली होती. दुसरीकडे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) याचिका दाखल करण्यात आली होती.
या याचिकेवर काल (सोमवारी) सुनावणी झाली असता न्यायालयाने आंदोलन हाताबाहेर गेले असल्याची टिप्पणी करत मनोज जरांगेंना चांगलेच खडेबोल सुनावले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता न्यायालयाने दुपारी तीन वाजेपर्यंत मराठा आंदोलकांना आझाद मैदान खाली करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आझाद मैदान खाली न केल्यास कठोर कारवाई करावी लागेल, असेही न्यायालयाने म्हटले होते.
मात्र, न्यायालयाच्या या आदेशानंतर मराठा आंदोलक (Maratha Protest) आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचे बघायला मिळत आहे. मराठा आंदोलकांनी आम्हाला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. तसेच आमच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. प्रसंगी आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. मनोज जरांगे पाटील यांचा आदेश येईपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही, असेही आंदोलकांनी म्हटले आहे.
दरम्यान, आम्हाला आरक्षण (Reservation) द्या, आम्ही आमच्या गावी जातो. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील येथे बसले आहेत तोपर्यंत आम्ही याठीकाणाहून हलणार नाही. मग कितीही दिवस लागो, तोपर्यंत मराठा बांधव मुंबईतून हटणार नाही असेही मराठा आंदोलकांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




