जालना | Jalna
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात (Murder Case) मंत्री धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव आले आहे. त्यामुळे विरोधकांकडून मंत्री मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील हे देखील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर टीका करत आहे. अशातच आज जरांगेनी माध्यमांशी बोलतांना मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटण्यासाठी आले होते, असा दावा केला आहे.
यावेळी जरांगे म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) अगोदर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे मला भेटायला आले होते.त्यावेळी पोरांनी त्यांना सांगितले की, मी झोपलो आहे आणि मी खरंच झोपलो होतो. त्यानंतर आम्ही भेटल्याशिवाय जाणारच नाही, असे त्यांनी म्हटले. मग मी त्यांना भेटायला गेलो, त्यावेळी त्यांनी निवडणुकीत लक्ष द्या असे म्हटले. मला या दोघांना भेटण्याची (Meet) इच्छा नव्हती. मात्र, ते बराच वेळ बाहेर थांबले होते. त्यामुळे त्यांना भेटलो”, असे मनोज जरांगेंनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की,”धनंजय मुंडे यांनी माझी आणि वाल्मिक कराडची ओळख करून दिली. त्यापूर्वी आमची ओळख नव्हती. त्यावेळी मला कराडचे कारनामे काय आहेत हे माहिती नव्हते. नाहीतर यांना उभे देखील केले नसते, असे जरांगेंनी म्हटले. तसेच यावेळी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे तुमच्या पाया पडले का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी विचारला असता जरांगे म्हणाले की, मी त्यावर काही बोलणार नाही ती निवडणुकीच्या वेळीच प्रक्रियाच असते. पण मी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
तसेच मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावर बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की,”मुख्यमंत्री महोदय तुम्हाला माणुसकी आहे की नाही. मराठ्यांचे मुडदे पडू देऊ नका, पोरं धडाधड आत्महत्या (Suicide) करत आहे. तुम्हाला मराठा समाजची दयामाया नाही का? तुमच्यामुळे आमच्या आत्महत्या होत आहेत. मला माझ्या जातीपेक्षा काहीच मोठे नाही. माझी हात जोडून शेवटची विनंती आहे की, तुम्ही तातडीने आरक्षण द्या अन्यथा आमचा संयम सुटेल”, अशा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
.