मुंबई | Mumbai
राज्य सरकारने मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर मराठा आरक्षणासंदर्भात एक शासन आदेश (GR) जारी केला होता. या जीआरमध्ये हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासोबतच पात्र मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाजामध्ये नाराजी पसरली आहे. या शासन आदेशाविरोधात मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी आक्रमक भूमिका घेत, सरकारविरोधात थेट न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानंतर आता मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला मोठा इशारा दिला आहे. यासोबतच ‘येत्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava) सरकारला कळेल. हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र द्या अन्यथा येत्या दसरा मेळाव्यास भूमिका जाहीर करावी लागेल”, असे मनोज जरांगे म्हणाले. तसेच आता अंतरवाली, नंतर नारायणगड आणि त्यानंतर घरी जाणार असल्याचे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच उपसमितीला सांगतो की, १७ सप्टेंबरच्या आत गॅझेटनुसार मराठवाड्यामधील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या. मंगळवार किंवा बुधवारी कॅबिनेट घ्या. सरकारने कुठलाही बदल करू नये. गावागावातील समिती कामाला लावा. १७ सप्टेंबरच्या आत निर्णय घ्यावा, नाहीतर मला मोठा निर्णय घ्यावा लागेल. कुणाचे एकूण आमची हेळसांड होऊ देऊ नका”, असे त्यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की, “मराठ्यांच्या मुलांनी जीआर काढला, मराठ्यांच्या मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या. अर्धा महाराष्ट्र पागल झाला आहे. काही अभ्यासक देखील पागल झाले. म्हणजे गरीबाच्या लेकरांनी किती मजबूत जीआर काढलेला आहे. आमच्या विरोधातील काही लोक तर इतके पागल झाले आहेत की, त्यांना झोपच येत नाही. मराठवाडा १०० टक्के आरक्षणात जाणार आहे. मराठ्यांनी टेन्शन घेण्याची गरज नाही. पण माझा मराठ्यांना एक सल्ला आहे की, विजय पचवता आला पाहिजे आणि पराजय सुद्धा पचवता आला पाहिजे, थोडं संयमाने घ्या, असेही जरांगे यांनी सांगितले.
छगन भुजबळांवर निशाणा
मला कुणबीतून आरक्षण पाहिजे. वेळ आल्यावर जशाच तसे उत्तर देऊ. जर कोणाचेही ऐकून थोडं जरी इकडे-तिकडे केले. त्या येवल्यावाल्याचे (छगन भुजबळ) ऐकून जीआरमध्ये हेराफेरी केली तर १९९४ चा जीआर आम्ही देखील चॅलेंज करू आणि तो सुद्धा रद्द करावा लागेल. आम्ही कुणावर हल्ला केला नाही, गुन्हे वापस घेतले जातील. तुम्ही जर आमच्या मुळावर उठणार असाल तर आम्ही देखील तुमच्या मुळावर उठू, असे देखील मनोज जरांगे यांनी म्हटले.




