मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये पुन्हा एकदा पेटला आहे. आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील यांना ओबीसीमधून मराठा आरक्षण हवा असून याशिवाय मराठा समाजासाठी त्यांनी अनेक मागण्या केल्या आहेत.
यासाठी जरांगे पाटील हे मुंबईमध्ये येऊन आंदोलन करणार आहेत. मात्र यावर हाय कोर्टाने नकार देत मुंबई बाहेर आंदोलन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या निर्णयावर मनोज जरांगे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मनोज जरांगे यांनी कोर्टाचा आदर व्यक्त करताना सरकारवर निशाणा साधला. “हा सारा खेळ सरकारचा आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही, म्हणून अशा खटपटी सुरू आहेत,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “लोकशाहीत आंदोलन हा आमचा हक्क आहे. आम्ही सर्व नियम पाळून आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहोत. सरकार कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न करत असलं, तरी आम्ही मागे हटणार नाही.”
जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “आझाद मैदानात उपोषणाला परवानगी का नाकारली? सरकार मराठा समाजावर अन्याय करत आहे. आमचा आंदोलनाचा हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मराठा समाज आरक्षणासाठी एकजुटीने मुंबईकडे कूच करत आहे,” अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या कायदेशीर आणि रास्त असल्याचा दावा केला.
जरांगे यांनी सरकारवर षडयंत्राचा आरोप केला. “सरकारला आम्ही दगडफेक करावी असं वाटतंय, पण आम्ही कायदेशीर मार्गानेच लढू. सरकारच्या या चाली आम्ही उध्वस्त करू,” असा इशारा त्यांनी दिला. कोर्टाच्या आदेशाबाबत बोलताना ते म्हणाले, “कोर्टाचा आदेश मी अद्याप वाचलेला नाही, पण आमचे वकील कोर्टात आमची बाजू मांडतील. मला विश्वास आहे की, न्यायदेवता आम्हाला नक्कीच न्याय देईल.”
मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला एकजुटीने लढण्याचे आवाहन केले. “आमच्या मागण्या योग्य आणि कायदेशीर आहेत. सरकारची पोटदुखी त्यामुळेच आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने लढत राहू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, आगामी काळात या आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




