मुंबई | Mumbai
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचे मुंबईतील आझाद मैदानात गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरु होते. अखेर काल (मंगळवारी) सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य झाल्याने त्यांनी उपोषण सोडले. जरांगे यांनी केलेल्या प्रमुख आठ मागण्यापैकी सहा मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यामुळे मराठा समाजाचा मोठा विजय झाला आहे. त्यानंतर आज (बुधवारी) मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलक्सी रुग्णालयातून माध्यमांशी संवाद साधताना मराठा बांधवांना आवाहन केले आहे.
यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून अखेर ही लढाई जिंकली. खूप प्रतिक्षा होती. अनेक शतकापासून शेवटी मराठ्यांनी (Maratha) यश त्यांच्या पदरात पाडून घेतलं म्हणून सगळ्यात आधी महाराष्ट्रातील (Maharashtra) सगळया मराठ्यांना या काढलेल्या तिन्ही जीआरचे (GR) सर्व श्रेय समाजाला देतो. सगळं यश समाजाने मिळवले असून, मी फक्त नाममात्र आहे”, असे त्यांनी म्हटले.
जरांगे पुढे म्हणाले की, “मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र शब्दावर मराठा समाजाने विश्वास ठेवावा. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा सगळे मराठे आरक्षणात (Reservation) जाणार म्हणजे जाणार यात तिळमात्र शंका नाही. ज्यांच्या नोंदी नाहीत, म्हणून गॅझेटीअर लागू करणे गरजेचे होते. जीआर निघणे खूप आवश्यक होते. १८८१ साली एक ओळ मराठ्यांच्या हिताची सरकारने लिहिली नव्हती. स्वातंत्र्य मिळून ७५-७६ वर्ष झाली. पण मराठ्यांच्या हक्काचे गॅझेटीअर असून मराठ्यांसाठी एक ओळ नव्हती. फक्त संयम, शांतता ठेवा. शांत डोक्याने विचार करा. एखादा विदूषक आणि अविचारी माणसावर विश्वास ठेऊन कधी आपण आपला संयम, विश्वास ढळू द्यायचा नाही” असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले.
तसेच “निर्णय घेताना मी कधी एकटा घेत नाही, आम्ही दोघं मिळून निर्णय घेतो. माझी सात कोटी गोरगरीब जनता आणि मी. बाकी काहीचं पोट यासाठी दुखत आहे की, आता त्यांच्या हातून सगळं गेलं. त्यांना आरक्षणावरून राजकारण करायचे होते, गॅझेटवर राजकारण (Politics) करायचं होतं. जे यावरच त्यांचे जीवन जगत होते, ते आता पूर्ण कोलमडणार आहे. हे लोक कधीच आपल्या बाजूने बोललेले नाहीत. ही आजची घटना नाही. मी काय करतोय हे मराठा बांधवांनी समजून घ्या. मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, हे पक्क डोक्यात ठेवा आणि आनंदी रहा. कुणाचं ऐकून तुमचं आणि माझं भलं होणार नाही. खूप टोळ्या उठणार आहेत. सरकारच्या बाजूने बोलून नकारात्मकता पसरवायची, कुणाला तरी खूश करायचं. हे समजून घ्या”, असेही मनोज जरांगे म्हणाले.




