
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
तालुक्यातील चास येथील कॉलेज परिसरातून एका तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द बुधवारी (27 मे) दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरूणीच्या वडिलांनी (वय 45) फिर्याद दिली आहे. त्यानुसार शुभम दीपक काकडे, दीपक काकडे, ऋषीकेश दीपक काकडे (सर्व रा. कोंभळी, ता. कर्जत) व शुभम चितळकर (पूर्ण नाव माहिती नाही, रा. साकत, ता. अहिल्यानगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना 13 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
फिर्यादी अहिल्यानगर तालुक्यातील एका गावात राहतात. त्यांची मुलगी चास येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. 13 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कॉलेजमध्ये फिर्यादी यांची मुलगी उपस्थित होती. त्यावेळी संशयित आरोपींनी तिला कॉलेजच्या बाहेर बोलावून स्विफ्ट कारमध्ये बसवून नगरच्या दिशेने नेले. त्यानंतर नेप्ती मार्केट परिसरात तिला स्कॉर्पिओ वाहनात बसवून पुढे घेऊन गेल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादी यांनी मुलीचा शोध घेत असताना संशयित आरोपींनी संगनमत करून मुलीला लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने पळवून नेल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ करीत आहेत.




