अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घर बांधण्यासाठी माहेरहून 20 लाख रूपये आणावेत, या मागणीवरून एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात रविवारी (26 जुलै) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या केडगाव येथे राहणार्या पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पती महेश मच्छिंद्र जेजुरकर, सासरे मच्छिंद्र म्हतारबा जेजुरकर, सासू कांताबाई मच्छिंद्र जेजुरकर (सर्व रा. ममदापुर, ता. राहाता) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीचा विवाह 2016 मध्ये झाला होता. लग्नानंतर सुरूवातीचा काही काळ संसार सुरळीत सुरू होता. त्यानंतर पती नोकरीनिमित्त परदेशात गेला. काही दिवसानंतर फिर्यादीला परदेशात बोलून घेतले. या काळात त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरूवात केली. दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करणे, शिवीगाळ करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे, असा प्रकार सुरू झाला. काही दिवसांनी ते भारतात आल्यानंतर प्रवरानगर येथे राहू लागले.
याचदरम्यान, घर बांधण्यासाठी माहेरहून 20 लाख रूपये आणण्याची मागणी पतीसह सासरच्या मंडळींकडून करण्यात आली. ही मागणी पूर्ण करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर फिर्यादीचा मानसिक छळ करण्यात आला. तिला उपाशी ठेवणे, अपमानास्पद वागणूक देणे तसेच सातत्याने त्रास देऊन माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.




