अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
नगर जिल्ह्यातील 12 पालिकांच्या निवडणुकीसाठी आता हळूहळू रंग भरण्यास सुरूवात होतांना दिसत आहे. गुरूवारी जिल्ह्यात नगराध्यक्ष पदासाठी आणखी 6 तर नगरसेवक पदासाठी 10 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे आतापर्यंत पालिका निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी 9 तर नगरसेवक पदासाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. दरम्यान, उमदेवारी दाखल करण्यासाठी शनिवारी अर्ज स्वीकारले जाणार असल्याने आता शेवटचे तिनच दिवस शिल्लक असल्याने सर्व पालिकांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.
काल श्रीरामपूरातून नगराध्यक्ष पदासाठी आघाडीच्यावतीने काँग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, कोपरगावातून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, शेवगाव नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पंचायत समितीचे माजी सभापती अरुण पाटील लांडे यांच्या पत्नी प्रथम नगराध्यक्षा विद्याताई लांडे यांनी दोन ( रा.काँ व अपक्ष ) तर भाजप पक्षाकडून माजी नगरसेवक सागर फडके यांच्या पत्नी सुजाता फडके यांनी एक असे एकुण तीन अर्ज दाखल झाले आहेत.
पालिका निवडणुकीसाठी सोमवारपासून (10 नोव्हेंबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षगटांमध्ये उमेदवारांबाबत अंतिम निर्णय न झाल्याने पहिल्या दोन दिवसांत (10 व 11 नोव्हेंबर) अर्ज दाखल प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नाही. तिसर्या दिवशी काही ठिकाणी उमेदवारांनी अर्ज सादर केले. यात राहाता, जामखेड, श्रीरामपूर व कोपरगाव आणि शेवगाव येथील इच्छुकांचा समावेश होता. गुरूवारी नगराध्यक्षपदासाठी सहा अर्ज दाखल झालेले आहेत. यात श्रीरामपूर, कोपरगाव आणि श्रीगोंदा पालिकेत प्रत्येकी एक तर शेवगावमध्ये 3 अर्ज दाखल झालेले आहेत. नगरसेवक पदासाठी राहाता 1 आणि शेवगावमध्ये 9 असे 10 अर्ज दाखल झालेले आहेत.
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सोमवार 17 नोव्हेंबरपर्यंत आहे. आधी शनिवार व रविवार सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, उमेदवारी दाखल करण्यास होणार उशीर लक्षात घेवून राज्य निवडणूक आयोगाने शनिवारी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास परवानगी दिलेली आहे. यामुळे आता शुक्रवार (14 नोव्हेंबर) शनिवार (15 नाव्हेेंबर) आणि सोमवार (17 नोव्हेंबर) असे तीनच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या तीन दिवसांत उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे आहेत एकूण दाखल अर्ज
नगराध्यक्ष- श्रीरामपूर, कोपरगाव आणि राहाता प्रत्येकी 1, शेवगाव 11 असे 14 तर नगरसेवक पदासाठी श्रीरामपूर आणि कोपरगाव प्रत्येकी 2, राहाता 3, श्रीगोंदा आणि जामखेड प्रत्येकी 1 आणि शेवगाव 14 असे एकूण 23 अर्जांचा समावेश आहे.
भाजपचे एबी फॉर्म आले, 17 तारखेला वाटप
नगर दक्षिणेत शेवगाव, पाथर्डी, जामखेड आणि श्रीगोंदा पालिकेसाठी निवडणूक होणार आहे. यात जवळपास सर्वच ठिकाणी भाजपने स्व बळावर निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्यावतीने प्रत्येक पालिकेसाठी प्रभारी नेमण्यात आलेले असून त्यांच्या मार्फत येत्या 17 तारखेला उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचे वाटप करण्यात येणार असल्याचे भाजप दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी सांगितले. पारनेर 48 हजार 85 (18.42 टक्के), श्रीगोंदा 74 हजार 762 (26.25 टक्के), राहाता 43641 (16.65 टक्के), नेवासा 95 हजार 790 (26.77 टक्के), कर्जत 73 हजार 556 (32.82 टक्के) असे आहे.
राष्ट्रवादी, काँग्रेसच्या गोटात शांतता
पालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाची तयारी केलेली दिसत असली तरी राष्ट्रवादीच्या दोनही पवार आणि काँग्रेससह अन्य लहान पक्षाच्या गोटात गुरूवारपर्यंत शांतता दिसत होती. येत्या दोन दिवसात पालिका निवडणुकीसाठी वेगवान घडामोडी घडणार असल्याची शक्यता असून यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी स्थानिक आघाड्यांचा जोर दिसणार आहे.




