अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहराला मुळा धरण, विळद पंपिंग स्टेशन ते वसंत टेकडी पर्यतच्या केंद्र सरकारच्या अमृत पाणी योजने कामामधील सर्व अडचणी दूर झाल्या असून शहराला लवकरच पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. वसंत टेकडी येथे अमृत योजनेमधून 50 लाख लीटर पाणी टाकीचे काम पूर्ण झाले असून याद्वारे नगर शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती, महापौर बाबासाहेब वाकळेे यांनी दिली.
शनिवारी महापालिकेच्यावतीने अंतिम टप्प्यातील जोडणी काम हाती घेतले आहे. त्या कामाची पाहणी महापौर वाकळे, आयुक्त शंकर गोरे यांनी केली. यावेळी संजय ढोणे, जल अभियंता परिमल निकम, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रोहिदास सातपुते, इंजि.गणेश गाडळकर आदी उपस्थित होते. वसंत टेकडी येथील जुनी 67 लाख लीटर पाण्याच्या टाकीचे दुरुस्तीचे कामही हाती घेतले जाणार आहे,
पाण्याची गळती बंद होऊन पाणी साठा वाढण्यास मदत होणार आहे. पुढील आठ दिवसांत मुळा धरण ते विळद पंपिंग स्टेशन पर्यंत अमृत पाणी योजनेचे पाणी येणार आहे. मुळा धरण ते नगर शहर असे एकूण 34 किलोमीटर पर्यंतचे अमृत पाणी योजनेचे काम सुरू असून लवकरच ते मार्गी लागणार आहे. अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण शहराला फेज टू पाणी योजनेद्वारे पूर्ण दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.