नवी दिल्ली | New Delhi
बीडच्या (Beed) केज तालुक्यातील (Kej Taluka) मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांची हत्या (Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपचे आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांकडून मंत्री मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. अशातच आता याबाबत स्वत: मंत्री मुंडे यांनी वक्तव्य केले आहे. ते आज दिल्ली दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी राजीनाम्याच्या विषयासह विविध विषयांवर माध्यामांशी बोलताना भाष्य केले.
यावेळी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, “नैतिकतेतून मी दोषी वाटत नाही, पण जर मुख्यमंत्र्यांना (CM) मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा. मुख्यमंत्र्यांनी तशी मागणी केली तर मी राजीनामा देण्यास तयार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवा. गेली ५१ दिवस ज्या पद्धतीने मिडिया ट्रायल सुरू आहे त्यातून मला टार्गेट केले जात आहे. मी पक्षाचा निष्ठावंत असून महायुतीच्या प्रचारातील प्रमुख व्यक्ती आहे. आपण निवडणुकीत टीका करतो, टीका सहनही करतो. पण, याबद्दलचा राग पुन्हा नसतो”, असेही मंत्री मुंडे यांनी म्हटले.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय नागरी व अन्न पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी (Prahlad Joshi) यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, “जोशी हे केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री आहेत,मी राज्यातील महायुती सरकारचा अन्न व पुरवठा मंत्री आहे. त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आलो होतो. तसेच राज्यातील नागरिकांना रेशन मिळण्याबाबत काही समस्या होत्या त्यांची माहिती मी त्यांना दिली. राज्यातील लोकसंख्या वाढली असून आता फक्त सात कोटी लोकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ मिळत आहे. जनसंख्या वाढली तर जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे होता. तसेच जे लाभार्थी आहेत त्यांना त्यांची सर्व माहिती द्यावी लागते. त्यात ऑनलाईनची (Online) जी समस्या आहे”, त्याची माहिती केंद्रीयमंत्र्यांना दिल्याचे मुंडे यांनी म्हटले.