Thursday, September 19, 2024
Homeनगरमहसूलमंत्री ना. विखे यांना राख्या बांधून लाडक्या बहिणींनी साधला संवाद

महसूलमंत्री ना. विखे यांना राख्या बांधून लाडक्या बहिणींनी साधला संवाद

राहाता |प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहिणींनी महायुती सरकारच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राख्या बांधून व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींशी संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बहिणींशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महीलांसाठी प्रवरानगर येथे डॉ.धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालीनीताई विखे पाटील, उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सरचिटणीस नितीन दिनकर, विखे कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

याप्रसंगी मंत्री विखे पाटील म्हणाले, महायुती सरकार देणारे सरकार आहे. आजपर्यंत महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद पडली नाही. लाडकी बहीण योजना पाच वर्ष सुरू राहाणारी आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. या योजनेमुळे राज्यातील महिलांचा सन्मान अधिकच वाढला असल्याचे त्यांनी सांगितले. महायुती सरकारच्या योजनेला विरोधक जाणीवपूर्वक विरोध करीत होते. त्यांना न्यायालयाने फटकारले, त्यामुळे बहिणींसाठी सुरू केलेली योजना कधीही बंद पडणार नाही अशी ग्वाही देवून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता योजनेच्या माहितीसाठी आणि त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी हेल्पलाईन नंबरची उपलब्धता करून देणार असल्याचे विखे पाटील यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील सर्व अंगवणवाडी सेविकांसह, ग्रामसेवक, आशा सेविका यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे नऊ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकला. त्यांचे अभिनंदन करून मंत्री विखे पाटील म्हणाले, विद्यार्थिनींकरिता मोफत शिक्षण आणि जेष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तिर्थ दर्शन योजना सुरू करून सर्व समाज घटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारची असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोफत धान्य योजनेला दिलेली मुदतवाढ आणि राज्य सरकारच्या आनंदाचा शिधा योजनेमुळे सामान्य माणसाला मोठा आधार मिळाला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी भाजपाच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.कांचन मांढरे, सौ.उमाताई वहाडणे, सौ.सोनाली नाईकवाडी यांच्यासह अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या