Friday, May 3, 2024
Homeनगरसरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही - आ. थोरात

सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस प्रत्यक्षात मदत नाही – आ. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

दोन वर्षानंतर यावर्षी मोठ्या उत्साहात सर्वत्र दिवाळी साजरी होते आहे. मात्र जास्त पाऊस झाल्याने शेतकरी अडचणीत आहे. या कठीण परिस्थितीत शासनाने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ही अपेक्षा असते. मात्र सध्या सरकारकडून फक्त घोषणांचा पाऊस असून प्रत्यक्षात मदत मात्र मिळत नाही, अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

- Advertisement -

दीपावलीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना आमदार थोरात म्हणाले की, यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकर्‍यांची उभी पिके वाया गेली आहेत. अशा संकट काळात सरकारने शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. ही सर्वांची अपेक्षा असते. मात्र सरकारकडून वृत्तपत्र, टीव्ही चॅनलवर फक्त घोषणांचा पाऊस सुरू असून प्रत्यक्षात शेतकर्‍यांना कोणतीही मदत मिळत नाहीत. काही लोक दौरे करून फक्त फोटो टाकतात. मात्र शेतकर्‍यांना मदत नाही ही वस्तुस्थिती आहे.

पीक विमा कंपनी कायमच नफा खोरी करण्याचा प्रयत्न करत असून अनेक वर्षापासून नफा मिळवण्यासाठी या कंपन्यांकडून शेतकर्‍यांवर अन्याय केला जातो. हा अन्याय होऊ नये आणि शेतकर्‍यांना तातडीने मदत मिळावी यासाठी महाविकास आघाडी सरकारने बीड पॅटर्न तयार केला होता. मात्र त्याला केंद्राने मान्यता दिली नसून यावर काय अंमलबजावणी होते ते भविष्यात कळेल.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे आजारी असताना त्यांनी दौरे केले. त्यांच्या समवेत आम्हीही विविध भागांमध्ये दौर्‍यामध्ये सहभागी होतो. त्यामुळे त्यांनी दौरे केले नाही हे म्हणणे राजकीय असल्याचे ही आमदार थोरात म्हणाले.

भारत जोडो यात्रा ही लोकशाही वाचवण्यासाठी

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर निघालेली भारत जोडो यात्रा ही लोकशाही व राज्यघटना टिकवण्यासाठी आहे. या यात्रेला अत्यंत अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून या यात्रेला कोणत्याही पक्षांचे बंधन नाही. देशात लोकशाहीचे, बंधूभावाचे व खुले वातावरण राहावे यासाठी लोकशाही च्या विचारांवर विश्वास असणार्‍या सर्व पक्ष संघटना यामध्ये सहभागी होत असून ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातही या भारत जोडो यात्रेचे अभूतपूर्वक स्वागत होईल असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या