मुंबई | Mumbai
पुणे आणि नागपूर (Pune and Nagpur) या शहरांच्या धर्तीवर नाशिकमध्ये (Nashik) देखील लवकरात लवकर मेट्रो धावायला हवी. मेट्रोच्या कामांमुळे पुरातन मंदिरे, जुनी घरे यांची कोणतीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशी मागणी विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ (MLA Pankaj Bhujbal) यांनी सभागृहात केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान ते विधानपरिषदेच्या सभागृहात बोलत होते.
यावेळी अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलतांना आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, कर्नाटकातील (Karnataka) होजिगिरी येथील शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाचे सुशोभीकरण करण्यात यावे. उत्तर प्रदेश सरकारने प्रयागराजमध्ये केलेले महाकुंभचे यशस्वी आयोजन हे धार्मिक पर्यटनाचे आदर्श उदाहरण आहे. त्याच धर्तीवर, महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) देखील नाशिकमध्ये (Nashik) २०२७ मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्तम नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, नाशिकमध्ये गोदावरी नदीपात्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७७६-१७९५ दरम्यान स्थापन केलेले कुंड नाशिक महापालिकेने केलेल्या काँक्रिटीकरणामुळे बुजवले गेले आहे. येत्या ३१ मे रोजी अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीदिनी या कुंडाचे पुनरुज्जीवन करण्यात यावे. नार-पार खोऱ्यातील पाणी नाशिक जिल्ह्यासाठी (Nashik District) मिळाल्यास नाशिकच्या शेतीला (Farm) मोठा लाभ होईल असेही पंकज भुजबळ यांनी म्हटले.
तसेच शेतकऱ्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही, त्यामुळे किमान आधारभूत किंमतीच्या संदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे (Central Government) पाठपुरावा केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच मोठ्या राज्यातील महानगरांमध्ये क्रीडांगणे, हॉस्पिटल्स, बागा यासाठी मोकळ्या जागा शिल्लक नाहीत. त्यामुळे नवीन इमारतींना परवानगी देताना सरकारने अशा सुविधांसाठी जागा ठेवण्याची अट घालावी अशा मागण्या देखील आमदार पंकज भुजबळ यांनी केल्या.