आश्वी |वार्ताहर| Ashwi
राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे पाठबळ दिले आहे. जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणे हेच आमचे प्राधान्य असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार असल्याचा विश्वास माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
नागपूर अधिवेशनासाठी रवाना होण्यापूर्वी आमदार विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेतले. आमदार अमोल खताळ, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, संचालक रामभाऊ भुसाळ, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे आदी उपस्थित होते. तसेच लोणी बुद्रुकचे ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रोत्सवात त्यांनी ग्रामस्थांसोबत सहभागी होवून दर्शन घेतले. यात्रेनिमित काढण्यात येणार्या काठीची विधीवत पूजा आमदार विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करून मिरवणूक काढण्यात आली.
त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना आमदार विखे पाटील म्हणाले, राज्यातील जनतेने महायुतीला मोठा प्रतिसाद मिळाला, याचे एकमेव कारण म्हणजे मागील अडीच वर्षांत सरकारने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आहे. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्याला पुढे कसे घेवून जायचे याबाबत निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. प्रत्येक विभागासाठी शंभर दिवसांचा कृती आरखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तोच आमचा भविष्यात प्राधान्यक्रम आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये नवे उद्योग आणून युवकांना रोजगार निर्माण करून देणे हा माझा प्राधान्यक्रम असणार आहे. यासाठी जिल्ह्याचा औद्योगिक विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यावर काम सुरू करायचे आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाला यंदा तीनशे वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारायचे हे उद्दिष्ट पूर्ण करायचे असून केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने स्मारक उभारले जाणार असून त्याचा आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.
श्री क्षेत्र नेवासा येथे ज्ञानेश्वर सृष्टीची उभारणी, गोदावरी कालव्याचे नूतनीकरण आणि निळवंडे कालव्याचे राहिलेले काम पूर्णत्वास नेणे हाच आपला पुढील काही दिवसांचा ध्यास असेल असेही विखे पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी झालेल्या महिलांच्या अर्जाची पडताळणी कुठेही सुरू नसल्याचे स्पष्ट करून महायुतीने जाहीरनाम्यात या योजनेचे अनुदान 2100 रुपये करण्याची ग्वाही दिली त्याची पूर्तता निश्चित होईल, असे विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले. तर नाशिक-पुणे रेल्वेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उतर देताना ते म्हणाले, अनेकांनी या प्रश्नाचे सुध्दा फलक लावून अनेक निवडणुका केल्या. आम्ही थेट रेल्वे आणून दाखविणार असल्याचा टोला त्यांनी थोरातांचे नाव न घेता लगावला.