नवी दिल्ली – भारतीय हवामान विभागाने आणि स्कायमेट या खाजगी संस्थेने मान्सून केरळमध्ये 30 किंवा 31 मे पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला असतानाच, आता आणखी एक आनंदाची बातमी आहे.
20 मे पर्यंत मान्सून अंदमानात पोहोचणार आहे. तसेच, केरळातील आगमनानंतर अवघ्या दहा दिवसांतच म्हणजे, 10 जून पर्यंत तो महाराष्ट्रातही दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
20 ते 22 मे दरम्यान अंदमानात मान्सूनचे आगमन होत असते यावेळी तो 20 तारखेला अंदमानात येणार आहे. त्यानंतर भारतातील मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळकडे त्याचा प्रवास सुरू होईल. 1 जून ला केरळमध्ये मान्सूनचे आगमन होत असते. यावेळी मात्र तो एक किंवा दोन दिवस आधीच येण्याची शक्यता आहे.
तोक्ते चक्रीवादळाचा हा सकारात्मक परिणाम आहे. चक्रीवादळामुळे मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाल्याने मान्सून लवकर दाखल होणार आहे. केरळमध्ये आगमन झाल्यानंतर 10 दिवसांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 8 ते 10 तारखेपर्यंत तळ कोकणात मान्सून दाखल होईल, त्यानंतर तीन ते चार दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी कोसळतील असा अंदाज आहे.