अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रेल्वेपूल नसल्याने नगर तालुक्यातील मांडवे येथील शेतकर्यांची मोठी अडचण झाली आहे. मांडवे-लोणी शिवारात रेल्वेने मोठी खोदाई करून
रेल्वेरूळ टाकल्याने येथील शेतकर्यांना रेल्वेरूळाच्या पलिकडील जमिनीत जाण्यासाठी रस्ताच राहिलेला नाही. यासंदर्भात येथे रेल्वे पूल होण्याबाबत आपण रेल्वे विभागाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन खासदार सुजय विखे यांनी दिले.
नगर-बीड-परळी रेल्वेचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हा मार्ग नगर तालुक्यातील मांडवे-लोणी शिवारातून गेला असून यासाठी रेल्वेने येथील शेतकर्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या. परंतु पठार भाग असल्याने रेल्वेने या भागात 25 ते 30 फूट खोल खोदाई करून रेल्वेरूळ टाकले आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या जमिनी दोन भागात कापल्या गेल्या आहेत.
या भागात सुमारे 100 फूट रूंद व दोन ते तीन किलोमीटर लांब दरीच तयार झाली आहे. त्यामुळे शेतकर्यांना रेल्वेरूळापलिकडील जमिनीत जाताच येत नाही. परिणामी मांडवे येथील शेतकर्यांचे सुमारे दीडशे हेक्टर क्षेत्र पडिक राहण्याची वेळ आली आहे.
याच संदर्भात खा. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते आदींनी शनिवारी मांडवे येथे जाऊन या भागाची पाहणी केली. रेल्वेपूल नसल्यामुळे या भागातील शेतकर्यांची खरंच मोठी अडचण झाली आहे. यासंदर्भात सोलापूर विभागीय रेल्वे अधिकार्यांकडे पाठपुरावा करून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन विखे यांनी दिले.