Wednesday, October 23, 2024
Homeनगरजनतेच्या कामासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय- ना. पवार

जनतेच्या कामासाठी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय- ना. पवार

योजना सुरू ठेवण्यासाठी महायुतीला सत्तेत ठेवण्याचे महिलांना उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन

श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda

जनतेच्या कामासाठी, राज्याच्या विकासासाठी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्याला सर्व सहकार्‍याची सहमती होती. सरकारमध्ये गेल्याने राज्याच्या हिताचे निर्णय घेता आले. मुख्यमंत्री लाडकी बहिण ते शेतकर्‍यांच्या वीज बिलमाफी यासह अन्य योजनांचा यात समावेश असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी एक महिलेने योजनांचा लाभ मिळण्यासाठी विचारलेल्या प्रश्नला उत्तर देतांना अजितदादांनी योजना कायम स्वरूपी चालवायची असेल तर महायूतीलाच कायम सत्तेत ठेवा, असे आवाहन केले.

- Advertisement -

उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत नागवडे कारखाना कार्यस्थळावर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांची माहितीसाठी महिला जनसंवाद कार्यक्रम, वाढदिवसाच्यानिमित्ताने अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, रमेश थोरात, राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे, बाळासाहेब नाहटा, दत्तात्रय पानसरे आदीसह तालुक्यातील नेते उपस्थित होते. ना. पवार म्हणाले, 35 वर्ष राजकारण, समाजकारण करत आहोत. राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो जनतेच्या हितासाठी आणि राज्याच्या विकासासाठी घेतलेला आहे. लाडकी बहिण योजनेमुळे महिलांच्या हाती वर्षाला 18 हजारांची जादाची रक्कम येणार आहे. यामुळे ग्रामीण भागात आर्थिक उलाढाल वाढणार आहे.

महाराष्ट्रचे भले व्हावे, शेतकर्‍यांचे कल्याण व्हावे, विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. आता कांदा निर्यात बंदी होणार नाही. मोफत वीज, दुधाला प्रतिलीटर पाच रुपये अनुदान, एक रुपयात पीक विमा, मुलींना उच्च शिक्षण मोफत या सर्व योजना यशस्वी करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मंत्री तटकरे म्हणाल्या, 15 दिवसांत राज्यात या 85 लाख माहिलांची नोंदणी झाली आहे. रोज पाच लाख अर्ज येत आहेत. ग्रामसभेत लाभार्थी यादी जाहीर होईल. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा पेन्शन प्रस्ताव आण्यात येणार आहे.

महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा नागवडे म्हणाल्या, शिवाजीबापू यांचा वसा आणि वारसा घेऊन तालुक्यात काम सुरु आहे. अजितदादाचे श्रीगोंदावर लक्ष आहे. पाटपाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादांनी अधिकचे लक्ष घालावे. यावेळी नागवडे कारखाना अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, महिला आमदार करण्यासाठी सर्वांचा सहभाग असावा. घोड, कुकडी पाणी प्रश्न, रस्ते वीज प्रश्न आपण लक्ष घातले. आता सर्वांनाबरोबर घेऊन अनुराधा नागवडे यांना आमदार करण्यासाठी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचे सांगितले. यावेळी माहिलांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दादांचा शब्द, कार्यकर्त्यांसाठी उत्साह
आपण दिलेला शब्द पाळतो. काम होणार असेल तरच बोलतो आणि जे बोललो तेच करतो, असे असे अजित पवार म्हणाले. यामुळे नागवडे कुटूंबाबला जर अजितदादांनी विधानसनेचा शब्द दिला असेल तर तो पूर्ण होणारच असेच अप्रत्यक्षपणे अजितदादांनी घोषित केले असल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या