कोतुळ, भंडारदरा |वार्ताहर| Kotul
उत्तर नगर जिल्ह्यातील शेती, उद्योगाला चालना देणार्या मुळा आणि भंडारदरा धरण पाणलोटात श्रावणसरींचा जोर काहीसा ओसरला असलातरी धरणांमध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. 26000 दलघफू क्षमतेचे मुळा आणि 11039 दलघफू क्षमतेचे भंडारदरा आणि निळवंडे ही धरणं सुमारे 88 टक्के भरली आहेत. या धरणातून विसर्ग सुरू असून हे पाणी जायकवाडी धरणाकडे झेपावत आहे.
गत पाच सहा दिवसांपासून पाणलोटात पाऊस कोसळत असल्याने मुळा, प्रवरा नदी दुथडी वाहत आहेत. त्यामुळे दोन्ही धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक वेगाने होत आहे. मुळा धरणात काल सकाळी पाणीसाठा 22436 दलघफू होता. त्यात 316 दलघफूची भर पडून हा साठा सायंकाळी 22752 दलघफूवर पोहचला. सकाळी कोतूळ येथील मुळा नदीचा विसर्ग 10342 क्युसेक होता. पण नंतर पावसाचा वेग मंदावल्याने सायंकाळी हा विसर्ग 5990 क्युसेक होता.
भंडारदरातील साठा 9649 दलघफू कायम ठेऊन सकाळी 6176 तर सायंकाळ 6082 क्युसेक सुरू होता. हे पाणी निळवंडेत दाखल होत असल्याने या धरणातील पाणीसाठा 7371 दलघफू झाला होता. या धरणातून प्रवरा नदीत सकाळी 9381 क्युसेकने सोडण्यात येत होते. सायंकाळी तो 5996 क्युसेकपर्यंत घटविण्यात आला.
* साठा
भंडारदरा 9649 दलघफू (87.41 टक्के), निळवंडे 7371 दलघफू (88.51 टक्के), मुळा 22752 दलघफू (87.50 टक्के), डिंभे 10995 दलघफू (88 टक्के)




