Thursday, May 21, 2026
HomeराजकीयBMC Election : धक्कादायक! बोटावरील शाई गायब, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याने फोटो शेअर करत...

BMC Election : धक्कादायक! बोटावरील शाई गायब, ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याने फोटो शेअर करत निवडणूक आयोगाला घेरले, नेमकं घडलं काय?

मुंबई । Mumbai

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदारांच्या बोटावर लावली जाणारी शाई सहजपणे पुसली जात असल्याचा खळबळजनक दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. यामुळे निवडणुकीतील पारदर्शकतेवर आणि बोगस मतदानाच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

निवडणूक प्रक्रियेत दुबार मतदान रोखण्यासाठी मतदाराच्या बोटावर न पुसली जाणारी शाई लावली जाते. मात्र, यावेळेस ही शाई मार्कर पेनच्या स्वरूपात असून ती थिनर किंवा इतर द्रव पदार्थांच्या सहाय्याने सहज पुसली जात असल्याचे ठाकरे गटाचे सचिव आणि युवासेनेचे पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांनी निदर्शनास आणून दिले आहे. दुर्गे यांनी सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले असून, एका फोटोत बोटावर शाईची खूण दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती पूर्णपणे पुसली गेल्याचे दिसत आहे.

या प्रकारामुळे बोगस मतदानाचा धोका वाढल्याची भीती व्यक्त करत साईनाथ दुर्गे यांनी शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. “शाई पुसली जात असल्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना, यावर कडक लक्ष ठेवा. गाफील राहू नका,” असे आवाहन त्यांनी केले आहे. या गंभीर आरोपानंतर आता निवडणूक यंत्रणा यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुंबईत सकाळी ९:३० वाजेपर्यंत सरासरी ६.९८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील बालमोहन विद्यालयात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याची घटना घडली. या ठिकाणी ईव्हीएमचे बटण दाबले जात नसल्याने सुमारे २० मिनिटे मतदान प्रक्रिया ठप्प होती. अखेर ते यंत्र बदलण्यात आले. विशेष म्हणजे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे मतदान याच केंद्रावर आहे. मशीन बंद राहिल्याने झालेला वेळ भरून काढण्यासाठी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एरवी मतदानाची शाई अनेक दिवस बोटावर टिकून राहते, ज्यामुळे एकाच व्यक्तीला दोनदा मतदान करणे अशक्य होते. मात्र, मार्कर शाईच्या तक्रारींमुळे प्रशासनाच्या तयारीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. मुंबईसारख्या संवेदनशील शहरात अशा तांत्रिक त्रुटींमुळे मतदानाच्या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राजकीय पक्ष आता अधिक आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : लग्नास विरोध करत पती-पत्नीला मारहाण

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar लग्नास विरोध असल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून पती-पत्नीला लाकडी दांडके आणि गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना वडगाव तांदळी (ता. अहिल्यानगर)...