मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणात चार वर्षानंतर पुन्हा एकदा मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नऊ खासदारांपैकी सहा खासदार हे बंडखोरी करून वेगळा गट स्थापन करणार असल्याचा दावा केला जात आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सर्व नऊ खासदारांना व्हिप बजावला गेला होता. मात्र बंडखोर सहा खासदारांनी व्हीप धुडकावून लावत बैठकीला गैरहजर राहिले. खासदारांनी बैठकीला पाठ फिरवल्यानंतर आता त्यांच्यावर ठाकरे गटाने कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. व्हीप आणि कारवाई हे अनपेक्षित वळण लागल्यामुळे फुटलेल्या खासदारांचे विलिनीकरण पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले जात असून, आता ठाकरे गट लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे या अनुपस्थित ६ खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी करण्याच्या तयारीत आहे. या संपूर्ण कायदेशीर आणि संविधानात्मक पेचावर विधिमंडळाचे माजी सचिव आणि कायदेतज्ज्ञ अनंत कळसे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार व्हिपचं पालन न केल्याने ठाकरे गट त्या खासदारांना नोटीस बजावू शकतो. त्यानंतर खासदारांची उत्तरे समाधानकारक आहेत की नाही हे ठरवून त्यांना अपात्र ठरवण्याची याचिका लोकसभा अध्यक्षांकडे देऊ शकतात. यावर अंतिम निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला घेतील.
पक्षांमधील फुट त्यांना स्पष्ट करता आली पाहिजे
“या प्रक्रियेत खासदारांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणे अपेक्षित नाही ते संविधानात्मक दृष्ट्या ग्राह्य धरले जाणार नाही. खासदारांसोबत त्यांचा पक्ष देखील गेला पाहिजे. पक्षांमधील फूट त्यांना स्पष्ट करता आली पाहिजे. त्यानंतर दोन तृतीयांश संख्या आवश्यक असते जर ती संख्या पूर्ण होत असेल तर या विलिनीकरणाला लोकसभा अध्यक्ष मान्यता देतील,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून फुटलेले आणि व्हिप बजावूनही बैठकीला अनुपस्थित राहिलेले संजय दिना पाटील, ओमराजे निंबाळकर, संजय हरिभाऊ जाधव, नागेश पाटील-आष्टीकर, संजय देशमुख आणि भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटाने आजच (18 जून) नोटीस पाठवली आहे. शिवाय त्यांना उत्तरे देण्यासाठी काही तासांचाच अवधी दिला आहे. त्यांनी वेळेत उत्तर न दिल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.




