मुंबई | Mumbai
गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईत धडकणारा मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा रोखण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. देवेंद्र फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात आली. परंतु मनोज जरांगे मोर्चावर ठाम आहेत. मात्र आता मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगेंना झटका दिला आहे. मनोज जरांगेंना आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हंटले आहे?
मुंबई हायकोर्टाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना मनोज जरांगेच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. हायकोर्टाने परवानगी नाकारत सांगितले की, अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्ते मनोज जरांगे आंदोलन करू शकत नाहीत. मुंबई उच्च न्यायालयाने मराठा कार्यकर्त्यांच्या मुंबईकडे मोर्चा काढण्याच्या एक दिवस आधी ही टिप्पणी केली. यासाठी कोर्टाने त्यांना गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा दाखला दिला. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने सांगितले की, ‘लोकशाही आणि मतभेद एकत्र जातात. परंतु निदर्शने फक्त नियुक्त ठिकाणीच केली पाहिजेत.’
तत्पूर्वी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी यांनी मंगळवारी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे यांची भेट घेतली आणि गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून मुंबईत प्रस्तावित असलेले त्यांचे आंदोलन पुढे ढकलण्याचे आवाहन केले. जरांगे यांनी महाराष्ट्र सरकारला मंगळवार (२६ ऑगस्ट) पर्यंत इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याचा इशारा दिला आहे अन्यथा निदर्शकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे म्हंटले आहे.
त्याचवेळी, जरांगे यांना निदर्शने करण्यासाठी खारघर किंवा नवी मुंबईसारखी पर्यायी जागा उपलब्ध करून देणे महाराष्ट्र सरकारसाठी खुले आहे, असे खंडपीठाने नमूद केले. मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये, असे निर्देश उच्च न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
मनोज जरांगे काय म्हणाले?
उच्च न्यायालयाने आंदोलनासाठी परवानगी नाकारल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही कायदा, संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करु, आम्ही मुंबईत १०० टक्के जाणार, न्यायदेवतेचे पालन करु, कोर्टाच्या नियमाचे उल्लंघन करणार नाही, आमचे वकील बांधव कोर्टात जातील, न्यायदेवता न्याय देईल, असे मनोज जरांगे म्हणाले. मुंबई उच्च न्यायालय शंभर टक्के परवानगी देणार, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. जनतेचे गाऱ्हाण न्यायदेवता ऐकेल, असेही मनोज जरांगे म्हणाले.
हा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही
लोकशाही मार्गाने जनता आंदोलन करु शकते. संविधानाचे सगळे नियम पाळून आंदोलन करतो आहे. मी २९ ऑगस्टला आझाद मैदानावर येणार आहे. उद्या १० वाजता आम्ही सगळे मराठे मुंबईकडे कूच करतोय. हा सरकारचा खेळ आहे, न्यायदेवतेचा नाही. रास्त मागण्या आहेत. कायद्याला धरुन आंदोलन आहे, म्हणून पोटदुखी आहे, असे मनोज जरांगेंनी सांगितले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




