मुंबई । Mumbai
मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात शनिवारी दुपारी मेट्रोच्या बांधकामादरम्यान एक अत्यंत दुर्दैवी आणि भीषण अपघात घडला. लाल बहादूर शास्त्री (LBS) मार्गावर मेट्रो पिलरचा सिमेंटचा मोठा भाग अचानक कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी १२:२० च्या सुमारास मुलुंडमधील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ मेट्रो मार्गिकेचे काम सुरू होते. यावेळी मेट्रोच्या पिलरचा एक अवजड सिमेंटचा स्लॅब अचानक निखळून खाली रस्त्यावरून जाणाऱ्या एका ऑटो रिक्षा आणि कारवर कोसळला. हा आघात इतका भीषण होता की, रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. ज्यावेळी हा अपघात झाला, तेव्हा रिक्षामध्ये चालक आणि तीन प्रवासी असे एकूण चार जण प्रवास करत होते.
अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान एका जखमी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. उर्वरित जखमींवर उपचार सुरू असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत.
या अपघातामुळे मेट्रो प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी मेट्रोचे एवढे मोठे काम सुरू होते, तिथे सुरक्षेसाठी आवश्यक असलेले ‘बॅरिकेड्स’ लावण्यात आले नव्हते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या भागातील बॅरिकेड्स हटवण्यात आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. अशा धोकादायक कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळेच हा निष्पाप नागरिकाचा बळी गेल्याचा आरोप होत आहे.
या दुर्घटनेनंतर एलबीएस रोडवरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा ताबा घेऊन वाहतूक इतर मार्गांवर वळवली आणि रस्त्यावरील राडारोडा हटवण्याचे काम सुरू केले. मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिलेल्या माहितीनुसार, मेट्रोच्या खांबाचा सिमेंटचा भाग नेमका तांत्रिक बिघाडामुळे पडला की कामातील हलगर्जीपणामुळे, याचा सखोल तपास सुरू आहे. मेट्रो प्राधिकरण आणि कंत्राटदाराकडून सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.





