मुंबई | Mumbai
विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांचे अभिनंदन केले. त्याचप्रमाणे राहुल नार्वेकर उत्तम काम करतील असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर नाना पटोले यांनी भाषण केले. त्यावेळी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता २०८ मते मिळाल्यावरुन त्यांनी जी खिल्ली उडवली त्यावरुन त्यांना प्रत्युत्तर दिले.
“मी जे निवडून आलोय, त्याबद्दल टिंगल… तुम्हाला आता नंबर द्यावे लागतील उपमुख्यमंत्र्यांना भविष्यात. एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि दोन नंबरचा उपमुख्यमंत्री. मला मिळालेल्या २०८ मताधिक्याबद्दलची टिंगल याठिकाणी उडवली जातेय”, असे म्हणत नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर झालेल्या भाषणादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पटोलेंच्या मताधिक्याचा उल्लेख करत टोला लगावला
काय म्हणाले नाना पटोले?
अध्यक्ष महोदय, मी जे २०८ मतांनी निवडून आलो त्याबद्दलची एक टिंगल या ठिकाणी करण्यात आली. मी सांगू इच्छितो की तुम्हाला दोन उपमुख्यमंत्र्यांना एक नंबरचा उपमुख्यमंत्री आणि क्रमांक दोनचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावे लागतील. उपमुख्यमंत्री बोला म्हटले तर दोघेही उभे राहू शकतात त्यामुळे हे करावे लागेल. मी जे २०८ मतांनी निवडून आलो त्यामुळे माझी खिल्ली उडवली गेली. इथे निवडून आलेला माणूसच बसू शकतो. किती मतांनी निवडून आला ते महत्त्वाचे नसते. मी पण विदर्भात उच्चांकी मताधिक्याने निवडून आलो आहे. मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा सभागृहात आलो तेव्हा उच्चांकी मताधिक्याने आलो होतो. उच्चांकी मतांनी निवडून आलो म्हणजे बक्षीस मिळतं असे नाही. हा काही चर्चेचा विषय नाही. मात्र टिंगल केली जाते आहे हास्यकल्लोळ करायचा असेल तर हे काही बरोबर नाही, असे नाना पटोले म्हणाले.
“लोकांनी मतदान केले आहे. त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आहे. त्याबद्दलची टिंगल याठिकाणी केली जातेय. जनतेच्या मतांवरच हास्यकल्लोळ करायचा असेल, तर हे काही बरोबर नाही”, अशा शब्दात नाना पटोलेंनी नाराजी व्यक्त केली.
“नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला त्याला मी पाठिंबा देतो. आपल्या सभागृहाला खूप समृद्ध अशी परंपरा आहे. भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेले होते असा मान असलेले हे सभागृह आहे. आपली मागच्या अडीच वर्षांतली कारकीर्द उत्तम होती. त्याचा उल्लेख आत्ता सगळ्यांनीच केला. सभागृहातील दोन्ही बाजूचे सन्मानीय सदस्य हे आपल्या भागांचे प्रश्न घेऊन सभागृहात येतात. सगळ्यांना आपले प्रश्न, जनतेचे प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. आपण कामकाज करताना मागच्या अडीच वर्षांत सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यात तुम्ही ९९ टक्के यशस्वी ठरलात.” असे नाना पटोले म्हणाले.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“गेल्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की, डाव्या बाजूची जास्त काळजी घ्या. जनतेनेच डाव्या बाजूची जास्त काळजी घेतलेली आहे. खरे म्हणजे जयंतराव आहेत, तर आता मज्जा आहे. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज बाबा सभागृहाच्या बाहेर गेले. नाना वाचले २०८. ईव्हीएममध्ये घोटाळा असता तर तुम्ही वाचले नसते”, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.