कळवण | प्रतिनिधी | Kalwan
नाशिक येथे नातेवाईकाचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्या नामपूर (Nampur) येथील भदाण कुटुंबीयांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिक-कळवण रस्त्यालगत कोल्हापूर फाट्याजवळ (Kolhapur Phata) एका बंगल्यावर आदळली. यामुळे झालेल्या भीषण अपघातात नामपूर व देवळा येथील पाच जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी (दि. ४) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. दोन्ही जखमींना नाशिक येथील रुग्णालयात (Nashik Civil Hospital) दाखल करण्यात आले आहे.
नामपूर येथील भदाण कुटुंबीय नाशिक येथे नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी गेले होते. सोहळा आटोपून सटाणा (Satana) येथे परतत असताना कार (क्र. एमएच ४१ बीई ५४४३) चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार (Car) विठोबा शंकर अहेर यांच्या बंगल्यावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, बंगल्याबाहेर असलेला सिमेंटचा खांबही वाकला गेला.
या अपघातामध्ये (Accident) शैला वसंत भदाण (६२), त्यांची जाऊ सरला भालचंद्र भदाण (५०), चालक खालिक मेहमूद पठाण (५०) रा. नामपूर, ता. सटाणा तसेच माधवी मेतकर (३२) आणि त्यांची मुलगी त्रिवेणी मेतकर (४) रा. देवळा हे जागीच ठार झाले. तर भालचंद्र भदाण (५२) रा. नामपूर आणि उत्कर्ष मेतकर (१२) रा. देवळा हे गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, त्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात (Kalwan Hospital) प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तसेच मृतांमध्ये शैला भदाण व माधवी मेतकर या मायलेकी असून, त्रिवेणी ही माधवी यांची मुलगी आहे. तसेच या अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबीयावर शोककळा पसरली आहे.