नाशिक | प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांपासून नाशिकहून दिल्लीसाठी जाणारी विमानसेवा सातत्याने रद्द होत असल्याने दररोज सुमारे साडेचारशे प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न केवळ नाशिकपुरता मर्यादित नसून, देशभरातील अनेक शहरांमधूनही विमानसेवा रद्द होत असल्यामुळे पर्यायी विमान व्यवस्था उपलब्ध करून घेणेही प्रवाशांसाठी कठीण ठरत आहे. विमानसेवा रद्द होण्यामागे केंद्र शासनाने वैमानिकांसाठी लागू केलेल्या कडक विश्रांती नियमांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगण्यात येते. वैमानिकांना सलग उड्डाणांनंतर किमान ४८ तासांची विश्रांती बंधनकारक करण्यात आल्यामुळे त्या कालावधीपूर्वी त्यांना सेवा देता येत नाही.
परिणामी, अनेक विमान कंपन्यांना मनुष्यबळाच्या कमतरतेला सामोरे जावे लागत असून, देशभरात दररोज सुमारे २०० ते २५० विमानसेवा रद्द होत असल्याची स्थिती आहे. नाशिककरांसाठी दिल्लीसाठी प्रामुख्याने इंडिगो या विमानसेवेवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, ही सेवा रद्द झाल्याने नाशिकमधील उद्योजक, व्यावसायिक तसेच पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसून येत आहेत. अचानकप्रवासरद्दझाल्याने व्यावसायिक बैठका, उपचारांसाठीचे नियोजन तसेच पर्यटन कार्यक्रम कोलमडले आहेत.
दरम्यान, सातत्याने होणाऱ्या विमानसेवा रद्दमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, तात्पुरत्या स्वरूपात तरी पर्यायी विमान, रेल्वे अथवा विशेष सेवा उपलब्ध करून देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





