नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने (Nashik City Police Commissionerate) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील जप्त करण्यात आलेला तब्बल ४ कोटी ८० लाख रुपये किमतीचा अमली पदार्थांचा साठा कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे नाशिकमधील ड्रग्जमाणि पोलिसांकडून (Police) मिळालेला हा स्पष्ट इशारा आहे. ड्रग्जमाफियांना शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणाऱ्या भद्रकाली पोलीस ठाण्यात २०१० मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यात गांजा जप्त करण्यात आला होता.
एनडीपीएस कायद्याच्या (NDPS Act) कलम ८ (क), २० (क) आणि २९ प्रमाणे केलेल्या या कारवाईत पोलिसांनी तब्बल २,४०० किलो गांजा जप्त केला होता. हा साठा न्यायालयात खटला सुरू असल्याने पोलिसांच्या मुद्देमाल कक्षात जमा होता. अखेर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या संपूर्ण गांज्याचा नाश करण्याचा मार्ग मोकळा झाला. ही संपूर्ण संवेदनशील प्रक्रिया गोपनीयतेत आणि बंदोबस्तात पार पडली. अमली पदार्थ उच्चस्तरीय ड्रग्ज डिस्पोजल समितीच्या देखरेखीखाली नियमांचे पालन करून हा विल्हेवाटीचा यशस्वी प्रयोग पार पाडण्यात आला. या धडक कारवाईतून नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) अमली पदार्थमुक्त नाशिक ही आपली भूमिका एकदा सिद्ध केली आहे.
यावेळी अॅन्टी नार्कोटिक्स टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योतीप्रिया सिंह, उपमहानिरीक्षक प्रवीणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण उपस्थित होते. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेने एनडीपीएसच्या वरिष्ठ निरीक्षक सुशीला कोल्हे तसेच निरीक्षक अंकुश चिंतामण, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, अंमलदार गणेश वडजे यांनी ही कार्यवाही केली.
विल्हेवाट पर्यावरणपूरक
सहसा जप्त केलेले अमली पदार्थ किंवा गांजा मोकळ्या मैदानात अथवा उघड्यावर जाळून नष्ट केले जातात. यामुळे प्रदूषण होते आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र, नाशिक पोलिसांनी या पारंपरिक पद्धतीला फाटा देत एक अत्यंत आधुनिक आणि पर्यावरणपूरक मार्ग निवडला. पुण्यातील रांजणगाव येथील महाराष्ट्र एन्व्हाइरो पॉवर लिमिटेड च्या अत्याधुनिक बंद इन्सिनरेशन प्लांटमध्ये (भट्टी) नेण्यात आला. तिथे सर्व तांत्रिक व पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करून अत्यंत उच्च तापमानात हा साठा राखेमध्ये रुपांतरित करण्यात आला.




