नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एकीकडे नाशिकच्या टीसीएस प्रकरणाने (Nashik TCS Case) संपूर्ण राज्य हादरले असताना, कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनाने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. टीसीएसचे (TCS) मुख्य कार्यकारी अधिकारी के. कृतिवासन यांनी नाशिक युनिटमधील (Nashik Unit) आरोपांच्या संदर्भात कंपनीच्या एथिक्स किंवा पॉश चॅनेलवर कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नेमके कोण खोटे बोलत आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा कसून तपास करत आहे. अनेक पीडित महिलांचे (Women) जबाब नोंदवले जात असल्याची चर्चा असताना, कंपनीने मात्र अंतर्गत रेकॉर्डमध्ये एकही तक्रार नसल्याचे ठासून सांगितले आहे. जर तक्रारीच नव्हत्या, तर पोलीस तपासात समोर येणारे दावे काय आहेत? एसआयटीने गोळा केलेले पुरावे आणि कंपनीचा नो कंप्लेंट दावा यामध्ये मोठी तफावत समोर आली आहे. यामुळे आता कंपनी प्रशासन आणि तपास यंत्रणा आमनेसामने येण्याची शक्यता आहे.
प्रकरणातील मुख्य संशयित (Suspected) म्हणून चर्चेत असलेल्या निदा एजाज खान बाबतही कंपनीने (Company) माहिती दिली आहे. अनेक माध्यमांनी (Media) तिला एचआर मॅनेजर म्हणून संबोधले असले तरी, टीसीएसने, ती केवळ एक प्रोसेस असोसिएट होती. तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे नेतृत्व किंवा भरती प्रक्रिया हाताळण्याचे अधिकार नव्हते, असेही नमूद केले आहे. निदा खानने तिच्या पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांना धमकावले की तिची भूमिका केवळ वैयक्तिक स्तरावर होती, याबाबत संभ्रम वाढला आहे.
अंतिम सत्य काय?
कंपनीने झिरो टॉलरन्स धोरणाचा पुनरुच्चार केला असला तरी, ‘तक्रारच आली नाही’, हा दावा गंभीर आहे की यंत्रणेतील त्रुटी दाखवणारा, हे आता एसआयटीच्या अंतिम अहवालातूनच स्पष्ट होईल. तोपर्यंत, टीसीएसचा हा लेटर बाँम्ब नाशिकच्या कॉर्पोरेट विश्वात चर्चेचा विषय ठरणार आहे.





