मुंबई । Mumbai
राजकारणातील आपल्या आक्रमक शैलीसाठी आणि वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत राहणारे शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कोण होता शिवाजी?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप झाल्यानंतर, चौफेर टीकेची झोड उठली आणि अखेर आमदार गायकवाड यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करत जाहीर दिलगिरी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप वणव्यासारखी पसरली होती. या क्लिपमध्ये आमदार संजय गायकवाड प्रकाशक प्रकाश आंबी यांना अश्लील भाषेत दमदाटी करताना ऐकायला मिळत होते. ज्या पुस्तकावरून हा वाद झाला, ते पुस्तक गोविंद पानसरे यांच्या विचारांवर आधारित असल्याचे सांगितले जाते. या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केल्याने गायकवाड यांचा संताप अनावर झाला होता.
वाढता वाद आणि जनतेचा संताप पाहता, संजय गायकवाड यांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली. ते म्हणाले, “मी प्रकाश आंबी यांना फोन करून विचारणा केली होती. ज्या दैवताने आपल्याला जगायला शिकवले, त्यांचा एकेरी उल्लेख आम्ही सहन करू शकत नाही. मी रागाच्या भरात त्यांना जे काही बोललो, त्यांच्या आईबद्दल किंवा पत्नीबद्दल जे शब्द वापरले असतील, त्याबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो.” मात्र, ही दिलगिरी व्यक्त करतानाही त्यांनी आपला मूळ आक्षेप कायम ठेवला.
गायकवाड यांनी या पुस्तकावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या दाव्यानुसार, या पुस्तकात सुमारे ५०० ते ७०० वेळा महाराजांचा एकेरी उल्लेख करण्यात आला आहे. “आपण आपल्या वडिलांचे नाव देखील एकेरी घेत नाही, मग कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा अपमान का? काही ठिकाणी तर महाराज मराठा वंशाचे नव्हते, असेही आक्षेपार्ह दावे करण्यात आले आहेत. ज्याला पुस्तक वाचायचे आहे त्यांनी ते खुशाल वाचावे, पण ‘छत्रपती’ असा सन्मानजनक उल्लेख करणे अनिवार्य आहे,” असेही गायकवाड यांनी ठणकावून सांगितले.
संजय गायकवाड यांनी यापूर्वीही विधानसभेत सर्व संस्थांच्या नावात ‘छत्रपती’ हा शब्द जोडण्याची मागणी लावून धरली होती. त्यांच्या या भूमिकेचे काही शिवप्रेमींकडून स्वागत होत असले, तरी एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे कायद्याला हातात घेऊन शिवीगाळ करणे कितपत योग्य आहे, असा सवाल आता विचारला जात आहे. सध्या या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या ऑडिओ क्लिप आणि धमकी प्रकरणाची दखल घेतली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





