नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात वाढत्या घरफोड्यांनी नाशिककर (Nashik) आधीच त्रस्त असताना आता चोरट्यांनी थेट शासकीय कार्यालयांनाच लक्ष्य केल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आडगावातील तलाठी कार्यालयाचा (Aadgaon Talathi Office) कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना समोर आली असून, ‘सरकारी इमारतीही सुरक्षित नाहीत’ असे अधोरेखित झाले आहे.
नाशिक शहरात (Nashik City) दोन-तीन दिवसाआड घरफोडीच्या घटना घडत असतानाच चोरट्यांची हिंमत वाढल्याचे चित्र दिसत आहे. आडगाव परिसरातील तलाठी कार्यालय फोडून चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल आहे.
आडगाव येथील तलाठी कार्यालयात कार्यरत कविता गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (दि. ५) सायंकाळी कार्यालय बंद केल्यानंतर ते शुक्रवारी (दि. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास उघडेपर्यंतच्या कालावधीत ही घरफोडी झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. चोरट्यांनी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गांगुर्डे यांच्या टेबलातील लॉक असलेले ड्रॉव्हर उघडून त्यातील ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे संशयितांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विशेष म्हणजे, ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांमधून चंदनाच्या झाडांची चोरी, काही टपाल कार्यालयांतून खुर्च्या व साहित्य लंपास होण्याचे प्रकार समोर आले हाेते. विशेष पोलिस महानिरीक्षक, विभागीय आयुक्त, वनाधिकारी तसेच सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या बंगल्यांनाही चोरट्यांनी लक्ष्य केल्याच्या घटना नोंद आहेत.




