नाशिक | प्रतिनिधी | Nashik
गणपती बाप्पा मोऱया, पुढच्या वर्षी लवकर या! असे साकडे घालत गणेश भक्तांनी मुसळधार पावसात (Rain) गुलालाची व फुलांची उधळण करत भव्य मिरवणुक काढुन श्री गणरायाला निरोप दिला. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये (Nashik) गणेश विसर्जनावेळी (Ganesh Visarjan) दोघांचा मृत्यू (Death) तर एक जण बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरातील आनंदवल्ली येथे गोदावरी नदीच्या (Godavari River) प्रवाहात दोघे वाहून गेले. यातील एक जण पोहून बाहेर आल्याने बचावला. तर दुसरा युवक प्रवीण शांताराम चव्हाण या युवकाचा शोध लागलेला नाही. तो सातपूर कॉलनी भागातील नातेवाईकांकडे आला होता.
यावेळी गणपती विसर्जनादरम्यान सायंकाळी पावणेसहा वाजता कमी उंचीच्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात शुभम नारायण पाटील (४०) आणि प्रवीण चव्हाण (२५) हे दोघे वाहून गेले. ही बाब लक्षात येताच मामा संदीप पाटील यांनी पोलीस व अग्निशमन दलास माहिती दिली. त्यानंतर सातपूर अग्निशमन केंद्राचे जवान या परिसरात तैनात होते. त्यांनी लगेच शोध मोहीम हाती घेत शुभम पाटील यास वाचवले. परंतु, प्रवीण चव्हाण सापडू शकला नाही. रात्री अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले होते. त्यानंतर आज (रविवारी) सकाळी पुन्हा एकदा शोध मोहीम सुरू करण्यात आली.
तसेच दुसरी घटना म्हसरूळ (Mhasrul) येथील बोरगड (Borgad) येथे घडली आहे. चंदर नथू माळेकर (वय २९) रा. म्हसोबावाडी, बोरगड असे मृत युवकाचे (Youth) नाव आहे. हा युवक गणपती विसर्जनासाठी काल (शनिवारी) दुपारी तीन वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मागे पाण्याने भरलेल्या दगडी तलावात गणपती विसर्जनासाठी गेला असता त्यात त्याचा बुडून मृत्यु झाला.
तिसरी घटना सिन्नर (Sinnar) येथे घडली आहे. सिन्नर शहराजवळ असणाऱ्या सरदवाडी धरणात गणपती विसर्जनासाठी ओमप्रकाश सुंदरलाल लिल्हारे (४०) रा. सिल्वर लोटस स्कूलजवळ, सिन्नर हा गेला असता त्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने मृत्यू झाला. या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे.




