नाशिक | प्रतिनिधी
नाशिक महानगरपालिकेत आज खऱ्या अर्थाने महिलांचे नेतृत्व केंद्रस्थानी आले आहे. महापौरपदी हिमगौरी आडके यांची निवड झाल्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोन्ही स्तरांवर महिलांचा प्रभाव अधिक ठळक झाला असून, मनपात ‘महिलाराज’ असल्याचे चित्र दिसून येत आहे.
महापालिकेत यापूर्वीच अनेक महत्त्वाच्या पदांवर महिला अधिकारी कार्यरत होत्या. आता त्यात महापौर म्हणून हिमगौरी आडके यांचा समावेश झाल्याने महिलांचे नेतृत्व अधिक भक्कम झाले आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, दुसऱ्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त संगीता नांदूरकर, कर उपायुक्त सुवर्ण दखणे तसेच शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी मीना चौधरी या सर्व महिला अधिकारी शहराच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
Nashik News: सिंहस्थपूर्व रस्ते कामांचा फटका; वाहतूककोंडीविरुद्ध ‘डिजिटल आवाज’
शहराच्या विकासाशी संबंधित निर्णय, योजनांची अंमलबजावणी, जनतेशी थेट संवाद, तसेच प्रशासनातील शिस्त या सर्व बाबींमध्ये महिलांचा ठसा स्पष्टपणे दिसून येत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण नियंत्रण, शिक्षण व्यवस्था अशा विभागांत महिलांच्या नेतृत्वामुळे कामकाज अधिक गतीने आणि पारदर्शकपणे सुरू आहे.
महिलांचे हे नेतृत्व केवळ सत्तेचे प्रतीक नसून, समाजातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नाशिक मनपात घडत असलेला हा बदल शहराच्या प्रशासनाला नवी दिशा देणारा ठरेल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
शंभर दिवसांचा ‘ॲक्शन प्लॅन’ : महापौर आडके
शहराचा सर्वांगीण आणि वेगवान विकास घडवण्यासाठी १०० दिवसांचा विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची घोषणा नवनिर्वाचित महापौर हिमगौरी आडके यांनी केली. त्या म्हणाल्या की, या कार्यक्रमांतर्गत प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवक व महापालिकेचे अधिकारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना केल्या जातील. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक असून, शहराचा विकास आणि सिंहस्थाचे यशस्वी आयोजन ही मोठी जबाबदारी आहे. नाशिक ही पुण्यनगरी आहे. मला ही संधी नसून सेवेची पर्वणी मिळाली आहे. कामातून ताकद, निष्ठा आणि विकास दिसला पाहिजे. विरोधकांनाही हीच अपेक्षा आहे, असे सांगत त्यांनी प्रभाग निधीबरोबरच शासनाच्या विविध योजनांतून जास्तीत जास्त निधी नाशिकसाठी आणण्याचा आपला निर्धार व्यक्त केला.





