नाशिक | प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसांत शहर वाहतुकीच्या पोलिसांनी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, व इतर ठिकाणी सुमारे शंभरपेक्षा जास्त रिक्षांवर कारवाई केली. या कारवाईचा रिक्षाचालकांनी चांगलाच धसका घेतला आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक आता नियमांचे पालन करू लागले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाहतूक पोलीस व नाशिकरोड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षाचालकांवर कारवाई सुरू आहे. रिक्षाचालकांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वाहतूक पोलिसांना रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी सर्व ठिकाणी कारवाई सुरू केली आहे. आणि एक रिक्षाचालक प्रमाणापेक्षा जास्त भाडे आकारणे, फ्रंटसीट बसवणे, प्रवाशांसोबत उद्धट वागणे, रस्त्यावर रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, जवळ कागदपत्र न बाळगणे, ड्रेस न घालणे असे नियम रिक्षाचालक पाळत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.
नाशिकरोड वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत रेल्वेस्थानक, बसस्थानक या परिसरात रोज रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांत तब्बल शंभरपेक्षा जास्त रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईचा रिक्षाचालकांनी चांगलाच धसका घेतला असून अनेक रिक्षाचालक आता नियमांचे पालन करू लागले आहेत. त्यामुळे बऱ्याच रिक्षा चालकांना शिस्त लागली आहे. या कारवाईचे नागरिकांनी तसेच प्रवाशांनी स्वागत केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





