पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पायी निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा ‘लाल तुफान’ मोर्चा शनिवारी (ता. २४) रात्री नाशिक शहराच्या हद्दीत धडकला आहे. घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. म्हसरूळ येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठासमोरील वनविभागाच्या परिसरात त्यांनी मुक्काम टाकला आहे. मोठ्या प्रमाणात वाहने मोकळ्या जागेत उभी राहिली आहेत. रात्री उशिरापर्यंत मोर्चेकरी पोहचतच होते.
दिंडोरी, सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, पेठ, हरसूल, त्र्यंबक, घोटी, इगतपुरीसह नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील, तसेच शहरी भागातील मोर्चेकरी पिंपळणारे येथून सायंकाळी चार वाजता निघाले. रात्री नऊ वाजेपर्यंत हजारो आंदोलक म्हसरूळला पोहचले. माजी आमदार जे. पी. गावित, भिका राठोड, जनार्दन भोये, उत्तम कडू, इंद्रजीत गावित, विजय घांगले, वसंत बागूल मुख्य भूमिकेत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, वनजमीन व गायरानधारकांना स्वतंत्र सातबारा उतारे, शिक्षणाचे खासगीकरण थांबवणे आणि पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी स्थानिकांना देणे आदी मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.
अखिल भारतीय किसान सभेचा मोर्चा नाशिक शहरातून मुंबईकडे जाणार असल्याचे मोर्चेकऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी (ता. २३) सकाळी हा मोर्चा दिंडोरी येथील संस्कृती लॉन्सपासून निघाला होता.
नवनिर्वाचित नगरसेवकाची मदत
म्हसरूळ (प्रभाग क्रमांक एक) येथील नवनिर्वाचित नगरसेवक प्रवीण जाधव यांनी मोर्चातील आदिवासी बांधवांची भेट घेतली. परिस्थिती बघून त्यांनी तात्काळ पिण्याच्या पाण्याचे सात टँकर उपलब्ध करून दिले. तसेच वीजपुरवठ्याचीही सोय करून दिली.




